अजूनकाही
यंदाच्या ‘पद्म’ सन्मान विजेत्यांमधील अनेक नावं मनाला पटणारी नाहीत. साध्वी ऋतुंभरा यांना देण्यात आलेला सन्मान मुळीच समर्थनीय नाही. बाबरी मस्जिद पाडली जाण्याआधी ऋतुंभरा यांनी केलेली काही भाषणं ऐकण्याची वेळ माझ्यावर एक वृत्तसंकलक म्हणून आली होती. त्यांची भाषणं धर्मांधता पसरवणारी होती, हे मीही अनुभवलं आहे. त्यामुळे त्यांना देण्यात आलेला सन्मान कोणताही विधिनिषेध न बाळगता केलेलं धर्मांधतेचं समर्थन आहे आणि ते सरकारला शोभणार नाही. यापुढच्या काळात जर आसाराम बापूसकट - सर्वच धर्मांतील - फॅसिस्टांना ‘भारतरत्न’ किंवा गेलाबाजार ‘पद्मविभूषण’ सन्मान दिला गेला, तर फारसं आश्चर्य वाटेल नको!
हा असंतोष व्यक्त करताना या यादीतील दोन नावांनी किमान मला तरी आश्चर्याचा सुखद धक्का दिला, हे प्रामाणिकपणे कबूल करायला हवं. वनव्रतस्थ मारुती चितमपल्ली आणि डॉ. विलास डांगरे ही ती नावं आहेत. खरं तर या दोघांनाही हा सन्मान याआधीच मिळायला हवा होता, असं वाटणाऱ्या असंख्य लोकांपैकी मी एक आहे.
पत्रकारितेच्या निमित्तानं नागपूर या शहरात माझं जवळजवळ अडीच दशकं वास्तव्य झालं. त्यामुळे अनुभवावरून सांगतो विलास डांगरे सुस्वभावी, सुसंस्कृत आणि रुग्णांची जात, धर्म, आर्थिक स्थिती न पाहता सेवाभावानं उपचार करणारे होमिओपॅथी डॉक्टर आहेत.
अॅलोपॅथी या वैद्यकशाखेतल्या बहुसंख्य डॉक्टरांची मतं होमिओपॅथीविषयी प्रतिकूल आहेत, हे मला ठाऊक आहे, पण डांगरे यांच्या उपचाराने दिलासा मिळालेले असंख्य रुग्ण आहेत. (यात ‘अ-भगव्या’ अनेकांचा समावेश आहे, हेही मला चांगलं ठाऊक आहे. मला मात्र त्यांच्याकडून उपचार घेण्याची वेळ कधीच आली नाही, हेही स्पष्ट करायला हवं!)
म्हणूनच (विचारानं 'भगवे' असले तरी) डांगरे यांना जाहीर झालेल्या ‘पद्म’ सन्मानाचे मन:पूर्वक स्वागत करायला हवं, अशी भावना माझीही आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
यंदा मारुती चितमपल्ली यांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला, याचा विशेष आनंद आहे. त्यांना ‘पद्मविभूषण’ हा सन्मान दिला असता, तरी चाललं असतं, इतकं त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. चितमपल्ली हे वनव्रतस्थतेचं पर्यायी नाव आहे.
पद्म सन्मानाच्या भगव्या यादीत फुललेलं हिरवं डौलदार फूल म्हणजे चितमपल्ली, वन आणि सागरी व्यासंगाचं भारतीय ज्ञानपीठ म्हणजे चितमपल्ली...
नागपूर सुटल्यापासून, म्हणजे साधारण जून २०१२नंतर आमची भेट तशी एकच झाली, पण हा माणूस त्याच्या पुस्तकांच्या रूपात एखाद्या वनसंतासारखा कायम सोबतीला आहे.
पद्म सन्मान जाहीर झाला आणि चितमपल्ली यांची झालेली १९८०च्या दरम्यान केव्हा तरी झालेली पहिली भेट आठवली. तेव्हा ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दैनिकात आलेलं त्यांचं लेखन वाचनात असल्याचे ते दिवस होते. ते लेखन वेगळं होतं, त्याला अनवट असा रानगंध होता. तसं तर, व्यंकटेश माडगूळकर, ना. धों. महानोर, र. वा. दिघे यांच्या लेखनातून रान, पशू, पक्षी, किडे, झाडं-फुलं, फळं, माती... असं बरंच काही कळलेलं होतं. ग्रामीण मातीत जडणघडण झालेली असल्यानं माडगूळकर, आनंद यादव यांचं लेखन आणि महानोरांच्या कविता बेहद्द आवडायच्या. त्या सर्वांच्या लेखनाची नाळ आपल्या चिरपरिचित मातीशी आहे, असं वाटायचं, म्हणून ते ‘आपलं लेखन’ असल्याचं ‘फिलिंग’ यायचं.
चितमपल्ली यांच्या लेखनाचा पोत मात्र वेगळा होता. त्यांचं लेखन माडगूळकर आणि तत्सम यांच्या पुढचं होतं. लेखनात ललित बहर फारसा नव्हता, अलंकारिक भाषा नव्हती, काही तरी नवीन सांगत असल्याचा अभिनिवेशी थाट नव्हता आणि ज्ञानी असण्याचा आवही नव्हता. जंगलाच्या गाभ्याला थेट भिडणारा त्यातला आशय महत्त्वाचा होता. जंगल प्रदेशाचं अपरिचित जगणं व्यक्त करणारं ते लेखन वाचणारानं अचंबित व्हावं, अशा विलक्षण साध्या शैलीत होतं.
कधी त्या लेखनानं जणू निर्सगालाच कवेत घेतलंय असं वाटायचं, तर कधी रानवाटांच्या कुशीत हे लेखन छानपैकी पहुडलेलं आहे, असं वाटायचं; तर कधी श्रावणसरीत त्या रानवाटा तुडवत आपणही चितमपल्ली यांच्यासोबत चालतोय असं वाटायचं; तर कधी जंगलाच्या श्वास-नि:श्वासाबद्दल अतीव आत्मीयतेनं कोणी तरी बोलतंय आणि त्याचा अनाहत नाद आपल्या मनात गुंजारव करतोय असं वाटायचं. इतकी आत्मीयता, ओतप्रोत ममत्व त्यांच्या लेखनात होतं... ते नंतर अधिकाधिक घनगर्द, व्यापक होत गेलं...
जे जंगलाबाबत तेच पुढे चितमपल्ली यांनी सागराबद्दल केलेल्या संशोधनाबद्दल घडलं. या व्यासंगातून त्यांनी मराठी भाषेत जी काही शब्दांची भर घातली आहे, ते त्यांचं कर्तृत्व दहा जणांच्या कवेत मावणारं नाही, इतकं अफाट आहे.
तेव्हा माझा पत्रकारितेचा पडाव नुकताच नागपूरला पडलेला होता. कोणालाही थेट भिडण्याइतका पत्रकारी ‘कोडगेपणा’ (या गुणाला हल्ली ‘कॉन्फिडन्स’ असं म्हणतात!) तोपर्यंत अंगी बाणला गेला होता. आधी फोन करून चितमपल्ली यांच्याशी भेटीची वेळ ठरवून घेतली. त्यांच्याशी फोनवर बोलताना ‘मला भेटणं हा तुमचाही सन्मान आहे’ असा राजकीय वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकाराला शोभणारा साहजिक अविर्भाव माझ्यात असणार.
मध्यम पण बळकटपणा प्रभावित करणारा बांधा, विस्तीर्ण भालप्रदेश, डोईवर अर्धकुरळे व काळे दाट केस, डोळ्यावर काळ्या मोठ्या फ्रेमचा चष्मा, पूर्ण बाह्यांचा पांढरा लायनिंगचा पॅन्टमध्ये व्यवस्थित इन केलेला धुवट शर्ट आणि पायात साध्याशा वहाणा असलेले चितमपल्ली भेटले.
आधी त्यांच्या या साध्या दर्शनाने आणि नंतर त्यांच्या ऋजू शब्दही जरा वरच्या पट्टीतलाच वाटावा अशा बोलण्या आणि लाघवी वागण्याने तेव्हा जे गारुड झालं, ते आजवर कायम आहे. नंतर नागपूरच्या लक्ष्मीनगरातील त्यांच्या नवश्रीमंत मध्यमवर्गीयांच्या तुलनेत साध्याशा फ्लॅटमध्ये आम्ही अनेक वेळा भेटलो. (या फ्लॅटमध्ये वर्षांनुवर्ष एकच बदल होत गेला आणि म्हणजे घरातील माणसांपेक्षा पुस्तकांची संख्या अशा मोठ्या गतीनं वाढत गेली की, त्या गर्दीत माणसं परकी वाटत).
तर, कधी कार्यक्रमात भेटलो, तर कधी साहित्य प्रसार केंद्र या राजाभाऊ कुळकर्णी यांच्या बर्डीवरील पुस्तकाच्या दुकानात, तर कधी आम्ही व्यासपीठावर सोबत असू. वर्षांमागून वर्षं उलटत गेली, पण चितमपल्ली पहिल्यांदा भेटले, तेव्हा होते तसेच साधे आणि त्याच मृदुपणे बोलत राहिले.
२०१६च्या डिसेंबरमध्ये माझा दोस्तयार डॉ. अनिल पिंपळापुरे याच्या ‘खगायन’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी त्यांच्यासोबत नागपुरात व्यासपीठावर होतो. तेव्हा चितमपल्ली यांच्यातला तो साधेपणा तस्साच नाही, तर बराचसा वाढलेला आणि त्या साधेपणाला खुलवणारं साधनेचं वलय आलेलंय असं जाणवलं. ते निवृत्त होऊन तेव्हा वीस वर्षं उलटलेली होती. अंगकाठी किंचित वाकलेली, खांदे काहीसे ओघळलेले, दाढी छातीपर्यंत वाढलेली आणि व्यासंगाचं शीतल तेज चेहऱ्यावर मंदपणे विलसत असलेले चितमपल्ली एखाद्या संत किंवा आत्ममग्न ऋषीप्रमाणे वाटले.
ते त्यांचं रुपडं इतकं भावलं की “आयुष्यभर वनसाधना करणारे मारुती चितमपल्ली आणि एखादा संत-ऋषी यात साधर्म्य आहे,” हे बोलून दाखवण्याला मी आवरच घालू शकलो नाही!
एक खंत नोंदवायला हवी, चितमपल्ली यांनी झाडं, पानं, बहर, फळं, फुलं, पशू, पक्षी एवढंच नाही, तर किडे, अळ्या, मुंग्या यांविषयी मूलभूत असं लेखन केलं; त्यावर संशोधन केलं, त्याच व्यासंगात आयुष्य झोकून दिलं. आधी पक्षी आणि उतारवयात महातन्मयतेनं मग्न होऊन ‘मत्स्य’ या विषयांवर महाअचाट कोश तयार केले.
हे असं काम यापूर्वी मराठीत झालेलं नव्हतं. ना ती कविता होती, ना ललित; ना कथा होती, ना कादंबरी. बरं जे काही चितमपल्ली यांनी सिद्ध केलेलं होतं, ते संशोधकीय थाटाचं बोजडही नव्हतं. मराठी साहित्याला विलोभनीय चकवा देणारी ती एक अभिव्यक्ती आहे, असंही म्हणता येईल. हे अतुलनीय असं काम आहे आणि त्यातही दोन्ही कोश तर विलक्षण संन्यस्त वृत्तीनं निर्माण झालेले आहेत, पण दुर्दैवाने या लेखनाची गंभीर समीक्षा झालेली नाही. कदाचित तो क्रूस पेलणं अशक्य आहे, म्हणून कोणी समीक्षक समीक्षा करून त्याचं अनमोलत्व पटवून देण्याच्या फंदात पडला नसावा.
‘चकवा चांदण’ हे निसर्गसाधनेच्या वेगळ्या वाटेवरच्या मारुती चितमपल्ली यांचं आत्मपर लेखनही त्यांच्यातला साधेपणा आणि त्यांच्या आजवर अज्ञात राहिलेल्या व्यासंगाचा ऐवज आहे, पण त्याचीही म्हणावी तशी गंभीर दखल मराठी समीक्षक आणि अभिजनांनी घेतलेली नाही. चितमपल्ली मार्केटिंगच्या साहित्यिक मॉलमध्ये कधी वावरले नाहीत.
स्वत:चा मठ वा पंथ निर्माण करून भक्तांचा गोतावळा करण्याच्या वाटेवर ते कधी चालले नाहीत. तसं चालणं मुळी त्यांच्या रक्तातच नाही. कोणत्या कंपूत, गटात सहभागी व्हावं आणि स्वत:चे ढोल स्वत:च बडवावे किंवा इतरांच्या किरट्या कर्तृत्वाचे ढोल बडवून त्यांच्याकडून स्वत:च्या कर्तृत्वाचे ढोल बडवून घेताना घुसमट होईल, असाच चितमपल्ली यांचा स्वभाव आहे.
अशात तर भगवा घेऊन चालणाऱ्या, भगव्या वाटेवर चालणाऱ्या आणि भगव्याची ‘कवनं’ गाणाऱ्या सुमारांनाही सरकारकडून ‘रमणा’ प्राप्त होतोय. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं केवळ चितमपल्ली यांना ‘पद्म’ सन्मान देण्याचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे आणि त्यांची निवड करण्याचा सुज्ञपणा दाखवणाऱ्या निवडकर्त्यांचं कौतुक करण्याचा कद्रूपणा दाखवण्याचं काहीच कारण नाही!
वयाची नव्वदी पार केलेले चितमपल्ली हाडांमांसाचेच माणूस आहेत आणि त्यांनाही भावना, राग आणि लोभ आहेतच. मानवी जगण्यात उन्मळून पडावे, असे प्रसंग त्यांच्याही आयुष्यात काही कमी आले नाहीत. त्यातले काही इतर अनेकांप्रमाणे मलाही ठाऊक आहेत, मात्र त्याही प्रसंगात चितमपल्ली यांनी दाखवलेली शांत चित्तवृत्ती केवळ आणि केवळ ऋषीलाच शोभेशी आहे.
त्या काळातही वन आणि प्राणी व्यासंगाचं अग्निहोत्र कायम तेवत ठेवण्याची त्यांची वृत्ती आपल्याला नतमस्तक करायला लावणारी आहे. हा माणूस खरंच संत किंवा ऋषी आहे, याची जितीजागती प्रचिती आहे. कोणतंही संकट आलं तरी शीतल छाया देण्याचं, फळण्याचं, फुलण्याचं असीमधारा व्रत वृक्ष पाळतोच. तोच व्रतस्थ बाणा बहुदा चितमपल्ली यांच्याकडेही आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
सोलापूर हे चितमपल्ली याचं जन्मगाव. त्याच ठिकाणी भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तेव्हा ‘कोण हे चितमपल्ली’ असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती अर्थातच नव्हती, तरी त्यांच्या निवडीवरून काही अभिजन दुखावले गेले. ‘सोलापूरकर’ आणि ‘सोलापूरच्या बाहेरचे’ असा वाद रंगवला गेला. विदर्भ साहित्य संघातला वावर; त्यातही विशेषत: अनेक वर्षं मनोहर म्हैसाळकर यांच्याशी असणारी सलगी आणि एक पत्रकार म्हणून साहित्य संमेलनाच्या निवडणुका कशा लढवल्या जातात, हे अनुभवल्यामुळे (माफ करा सोलापूरकरांनो!) मीही मत व मनानं चितमपल्ली यांच्यासोबत होतो. सोलापूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मारुती चितमपल्ली विजयी होणं, ही एक औपचारिकता उरलेली होती. तरी एक कडवटपणा वातावरणात पसरवला गेला आणि चितमपल्ली यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला.
चितमपल्ली यांचं मोठेपण असं की, प्रतिस्पर्ध्यांविषयी त्यांनी प्रचारात आणि निवडणुकीत विजय मिळाल्यावरसुद्धा किंचितही कटुता व्यक्त केली नाही. विनाकारण टीकेचे जहरी आसूड ओढले जातात, तेव्हा राजकारणात वावरणाऱ्यांचे सभ्यपणाचे मुखवटे कसे गळून पडतात आणि त्याचा अकारण तोल कसा सुटतो, हे एक पत्रकार म्हणून जवळून बघितल्यानं तर, चितमपल्ली यांची त्या काळातील अनुभवलेली ऋजुता आणि सुसंस्कृतपणा मनाच्या कुपीत कस्तुरी गंधासारखा जपून ठेवावा असाच आहे.
अशी जी माणसं पत्रकारिता करताना माझ्या पिढीला भेटली, त्यामुळेच जगण्याचा अर्थ कळला... त्यामुळेच जगण्याचं सार्थक झालं, अशी माझी ज्यांच्याविषयी भावना आहे, त्यात एक मारुती चितमपल्ली आहेत.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment