अलीकडे माझा निद्रानाश कमी झाल्यामुळे मला स्वप्न पडलंच की, मी अध्यक्ष झालो!
पडघम - साहित्यिक
विनय हर्डीकर
  • संमेलनाचे बोधचिन्ह आणि इंडिया गेट
  • Mon , 17 February 2025
  • पडघम साहित्यिक साहित्य संमेलन Sahitya Sammelan तारा भवाळकर Tara Bhavalkar विनय हर्डीकर Vinay Hardikar

गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या शेवटी एका साहित्य-वाकबगार (man who gets things done) मित्राचा फोन आला- ‘तुमची एकूण किती पुस्तकं आहेत?’

पंचाहत्तरीचे कार्यक्रम चांगले झाल्यामुळे मी थोडा हवेत होतो, तो जमिनीवर आलो. ‘का रे बाबा? माझं स्थळ कुणाला सुचवतो आहेस?’, मी विचारलं. तो म्हणाला, ‘दिल्लीला अध्यक्षपदासाठी तुमचं नाव आम्ही सुचवणार आहोत, पण सध्या कुणाला सांगू नका.’

पुढे निवडणूक लागली. ‘लाडकी बहीण’ वगैरे घोषणा झाल्या, पण माझ्या डोक्यात विषय चालू राहिला. थोडं बरं वाटलं, हेही कबूल केलं पाहिजे. निवडणुकीनंतर पुण्याला महामंडळाची बैठक झाली आणि तारा भवाळकर, विश्वास पाटील, ज्ञानेश्वर मुळे, अभय बंग यांच्या पॅनलमध्ये शेवटचं नाव माझं होतं, हे कळलं.

ताराबाई सिनियर, संशोधक, लेखिका. विश्वास पाटील लोकप्रिय कादंबरीकार. ज्ञानेश्वर मुळे कविता-गद्य दोन्हींमधलं नाव. विश्वास आणि ज्ञानेश्वर यांचा साहित्य आणि शासन दोन्हीकडे वावर. अभय बंग सामाजिक आरोग्यासाठी केलेल्या कामामुळे नक्कीच माझ्यापेक्षा जास्त लोकांना माहीत आहेत.

मी त्या मित्राला म्हटलं, ‘यांच्यात माझा निभाव कसा लागणार? तुझीच चेष्टा होईल.’ त्याने उत्तर दिलं, ‘असं तीन-चार वर्षं पॅनलमध्ये नाव आलं की, तुम्ही अध्यक्ष व्हाल.’ मुत्सद्दीच तो!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मला काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार, अशी आवई उठली की, सुशीलकुमार शिंद्यांचं नाव नक्की यायचं, त्याची आठवण झाली. तरीही अलीकडे माझा निद्रानाश कमी झाल्यामुळे मला स्वप्न पडलंच की, मी अध्यक्ष झालो!

पहिली घोषणा मी अशी केली : माझं अध्यक्षपदाच वर्ष हे आत्मपरीक्षणाच वर्ष असेल (‘आम्हास आम्ही पुन्हा पहावे’ - मर्ढेकर). दुसरं असं ठरवलं की, येत्या वर्षभरात मी सरकारकडे मराठी साहित्यासाठी काहीही मागणार नाही. त्याच सुमाराला मराठीला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाला म्हणून सरकारसकट कुणाचेही आभार मानणार नाही. कारण हजार वर्षांच्या लिखित साहित्याची परंपरा असलेली भाषा ‘अभिजात’ आहेच, हे सांगायला सध्याच्या राज्य आणि केंद्र सरकारांची गरज नाही.

मी फक्त एक सत्कार स्वीकारेन. साहित्य परिषद आणि महामंडळ यांच्यातर्फे, तोही एक पुष्पगुच्छ घेऊन.

मी जास्तीत जास्त गावी कार्यक्रमांना स्वखर्चाने जाईन. (काही साधनसंपन्न मित्रांना येत्या वर्षभर माझ्यासाठी कार आणि ड्रायव्हरची सोय करा, असं सांगून ठेवलं होतं) तिथंही फक्त एक फूल स्वीकारेन. कार्यक्रमाचं निमित्त सत्कार किंवा पारितोषिक वितरण असंच बहुतेक असणार. ती औपचारिकता लवकर पूर्ण करून त्या गावातल्या साहित्यप्रेमींकडून एखादी साहित्यविषयक चर्चा व्हावी, असा आग्रह धरेन.

दिल्लीला मी स्वखर्चानं जाईन व राहीन आणि त्या संमेलनात एक संपूर्ण दिवस किंवा निदान दोन सत्रं दिल्लीमधल्या इतर भाषिक लेखकांसाठी राखून ठेवण्याचा आग्रह धरेन.

लेखक, समीक्षक, प्राध्यापक, परीक्षण-लेखक यांच्याबरोबरच प्रकाशक, मुद्रक, बाइंडर (‘सखाराम’ सोडून), वितरक, पुस्तक विक्रेते, मुखपृष्ठ चित्रकार, सजावट करणारे यांचाही वाटा साहित्य व्यवहारात खूप मोठा आहे. त्या मंडळींना मी स्वतः भेटेन. गावोगावची ग्रंथालयं आणि वाचनालयं यांची सध्याची परिस्थिती बिकट असणारच. त्यांच्याशी विचारविनिमय करून काही उपाय शोधण्याची धडपड करेन.

वाचक हा साहित्याचा आधार आहे. गेली अनेक वर्षं मी ‘सुजाण वाचक’ पुरस्कार सुरू करावेत, त्याबरोबरच मराठी वाचकांचं एक सर्वेक्षण करावं, अशी भूमिका मांडत आलो आहे. विशेषतः नवशिक्षित वाचक, निरनिराळ्या सेवा व्यवसायांतील वाचक, मुलांना सांभाळणाऱ्या महिला यांची अभिरुची समजून घेतली पाहिजे.

पुरस्कार हवे तेवढे आहेत. मी एक बँकेत खातं उघडेन आणि सगळ्यांनी या वर्षीच्या पुरस्कारांच्या रकमा त्या खात्यात जमा कराव्यात, अशी कळकळीने विनंती करेन. त्यातून जमा होणारा निधी कोणकोणत्या  साहित्यविषयक उपक्रमांसाठी राबवता येईल, यासंबंधी सगळ्यांशी बोलेन.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

गावोगाव कार्यक्रम होत असतात. कार्यक्रमानंतर पाहुणचाराच्या नावाखाली पार्टी देऊन प्रमुख पाहुण्याला तर्र करून, त्याची मुक्ताफळं आणि मर्कटलीला पुढल्या प्रमुख पाहुण्याला ऐकवण्याचा धंदा करणारी रसिक मंडळी हवी तेवढी आहेत. मीही रसिक आहे. त्यामुळे पार्ट्यांना जाईन, पण तिसरा पेग कुणीही घ्यायचा नाही, ही अट आधी मान्य करूनच.

मराठी माणसांच्या कोणत्याही संस्थेत तीन गट असतातच. दोन एकमेकांविरुद्ध आणि तिसरा तटस्थ. मी पाहिलेल्या सगळ्या साहित्य संस्थांमध्येही हा प्रकार आहे. एकमेकांवर कुरघोडी करत ही मंडळी वेळ आणि ऊर्जा वाया घालवतात. मी त्यांच्यामध्ये मध्यस्थी जरूर करेन, पण तिन्ही गटांतील प्रत्येकी एक व्यक्ती हजर असेल तरच. कागाळ्यांना मी उत्तेजन देणार नाही.

हे सर्व केल्यानंतर वर्षभराचा लेखाजोखा सर्वांसाठी मांडणारा एक लेख लिहीन.

मला फोन आला. तारा भवाळकर यांचं नाव सर्वानुमते मान्य झालं. आणि मलाही बरं वाटलं. मी ताराबाईंना फोन केला आणि म्हटलं की, मी तुमच्यासाठी माझं नाव नक्की मागे घेतलं असतं. पण तरीही माझ्यातला पत्रकार मला सांगतच होता, सुशीलकुमार शिंदे शेवटी एकदा मुख्यमंत्री झालेच, पण माझ्यातल्या लेखकाची भिस्त श्री. म. माट्यांवर आहे. ‘स्वर्गातील साहित्य संमेलन’' हा लेख माट्यांनी पुण्यात (साक्षात मर्त्य लोकांत) बसूनच लिहिला होता!

..................................................................................................................................................................

लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत. त्यांचा मोबाईल नं. - ८४४६५ ५४०६६.

vinay.freedom@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......