तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत
संकीर्ण - श्रद्धांजली
मनोज कुमार झा
  • सीताराम येचुरी
  • Sun , 15 September 2024
  • संकीर्ण श्रद्धांजली सीताराम येचुरी Sitaram Yechury

दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्यासोबत एका कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ते आणि मी जयपूरहून परतत होतो. तेव्हा त्यांच्या हातात लेखक  डेविड बोडानिस यांचं ‘E = MC2’ हे पुस्तक होतं. मला माहीत होतं की, ते खूप वाचन करतात. म्हणून मी त्यांना त्या पुस्तकाविषयी विचारायला सुरुवात केली. मी पुस्तक चाळून पाहिलं आणि मला ते आवडलं. त्यांना माझी जिज्ञासा लक्षात आली. ते मला म्हणाले की, ‘मला तुमचा पत्ता द्या.’ मी त्यांना माझा पत्ता दिला आणि चार दिवसांच्या आतच त्या पुस्तकाची एक प्रत माझ्या घरी पोहोचली. तेव्हा मी विद्यापीठात राहत होतो.

येचुरी यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे होतं की, ते लोकांसोबत स्वतःला खूप कुशलतेने जोडून घ्यायचे. तेव्हा मी खासदार नव्हतो, पण तरीही मी जेव्हा केव्हा त्यांच्यासोबत असायचो, तेव्हा ते खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे, एवढंच नाही तर ते फोन करून अनेकविध गोष्टी सांगायचे.

आणखी एक घटना सांगतो. मी जेव्हा राज्यसभेत आलो, तेव्हा ते निवृत्त होणार होते. त्यांनी मला एक संदेश पाठवला की, ‘कॉम्रेड, तू खूप योग्य वेळी राज्यसभेत येतो आहेस. मी बाहेर पडतोय आणि तू येतो आहेस.’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

राजकारणात एवढं दीर्घ करिअर करणारा नेता मला असं म्हणत होता. त्यांच्या त्या वक्तव्यातील भाव लक्षात येऊन मी रोमांचित झालो होतो. जे माकपच्या ‘पॉलिट ब्युरो’ या सर्वांत उच्च अशा विभागात इतका दीर्घ काळ होते, ज्यांचा संसदीय कारकिर्दीचा इतिहास उज्ज्वल होता, ज्यांना एकेकाळी राज्यसभेतील सर्वश्रेष्ठ खासदार मानलं गेलं, असे येचुरी (१९५२-२०२४) दीर्घ आजाराशी झुंज देऊन या जगातून कायमचे निघून गेले. मी भावुक झालो आहे, आज खरोखरच मला शब्द अपुरे पडतायत. मी त्यांना किती आणि कसं आठवू?

त्यांच्या जाण्याची बातमी पसरताच आमचे नेते लालू प्रसाद यादव यांनी मुंबईहून मला फोन केला आणि म्हणाले, ‘ओह, हे काय घडलं? काय झालं होतं?’ मग मी त्यांना सगळं सांगितलं. येचुरी यांचा विशेष गुण पहा की, ते लालू प्रसाद यादव यांच्याशी जितके जोडले गेले होते, तेवढेच ते तेजस्वी यादव यांच्याशीही जोडलेले होते. एकाच वेळेला अनेक पिढ्यांसोबत घट्ट संबंध ठेवण्याच्या त्यांच्या गुणाची आता खूप चर्चा होईल. ते प्रत्येक स्तरातील लोकांशी बळकट संबंध किंवा ओळख निर्माण करणारे कुशल राजकीय नेते होते.

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला. 

प्रत्येक मृत्यू त्याच्यामागे एक शून्य निर्माण करून जातो, पण कॉम्रेड येचुरी यांच्या मृत्यूमुळे जे शून्यपण निर्माण झालं आहे, त्याची भरपाई कधी होईल, असं मला वाटत नाही. तुम्ही दुसरा कॉम्रेड येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. साधारणपणे त्यांना कधी रागावताना पाहिलं नाही. हे सगळे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत.

आज आपलं राजकीय विश्व खूप कडवट होत चाललंय आणि प्रत्येक ठिकाणी शत्रुत्व स्वार होऊ लागलंय, वैर राखणारी भाषा प्रचलित झालीय. अशा काळात येचुरी यांनी राजकारणातील थेट ‘भारतीय स्वभावधर्मा’ला जिवंत ठेवलं होतं. हा ‘भारतीय स्वभाव’ असा आहे की, आपण एकमेकांचे कितीही मोठे विरोधक झालो, तरी एका विशिष्ट परिघात वा व्यासपीठावर आपण एकमेकांसोबतच असतो.     

खासकरून कॉम्रेड हरकिशन सिंह सुरजीत यांच्यानंतर देशाच्या राजकारणात जो संक्रमण काळ आला, त्यात डाव्यांच्या गटात सीताराम येचुरी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत होती. युपीए सरकारमध्ये डावे पक्ष सामील झाले होते. आघाडी कशी बनवायची, मुद्दे कोणते असतील, सरकारचा ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’ कोणता असेल हे सगळं ठरवण्यात त्यांनी जी भूमिका निभावली, तिचं कायम स्मरण केलं जाईल.

कॉम्रेड सुरजीत सिंह यांच्यानंतरच्या काळात शेतकरी-मजूर यांचं राजकारण, परिघावरील जनतेचं राजकारण करणं सोपं राहिलं नव्हतं. सिद्धान्त, तत्त्वं यांत बरेच बदल झाले होते. बहुसंख्याकांच्या वर्चस्वाचं राजकारण स्वार होऊ लागलं होतं, तेव्हा कॉम्रेड येचुरी यांनी केवळ सुरजीत यांचा वारसा पुढे चालवला असं नाही, तर डाव्या विचारांप्रती उमेद कायम जागती राहील हे पाहिलं. खासकरून २०१०नंतरच्या राजकीय विश्वात मजूर, कामगार आणि परिघावरील लोकांचा भरवसा जिवंत ठेवण्याचं काम येचुरी यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं होतं.

ते अखेरपर्यंत परिघावर फेकले गेलेले सामाजिक-आर्थिक मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी राहावेत यासाठी कार्यरत राहिले. हल्लीच्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठका जरी तुम्ही पाहिल्या, तरी त्यात येचुरी यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती, हे लक्षात येतं. ते केवळ लोकांनाच विरोधी बाजूला एकत्र करण्यात व्यग्र नव्हते, तर आवश्यक मुद्देही त्या बाजूने जोडून घेण्याचा प्रयत्न करताना दिसायचे.  

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

त्यांची आठवण काढताना आपल्याला ही बाब नक्की लक्षात घ्यायला हवी की, कोणत्याही विचारधारेचा उदय व पतन यांची एक प्रवृत्ती असते. आज जी विचारधारा खूप प्रभावशाली मानली जातेय, ती कितीतरी दशकं परिघावर पडून होती. कदाचित प्रत्येक विचारधारेच्या बहराचा एक कालखंड असतो. जसं संस्कृतीचं उदय आणि पतन होतं, त्याच पद्धतीने विचारधारांचंही उदय व पतन होत असतं. आज कोणतीही शंका मनात न बाळगता हे मान्य केलं पाहिजे की, उत्तर भारतात डावे पक्ष पूर्वीसारखे प्रभावशाली राहिलेले नाहीत. कोणे काळी डावे मुख्य विरोधी पक्ष असायचे.   

आज डाव्या विचारांसाठी पोषक नसणाऱ्या काळातही येचुरी यांनी कायम हा निर्धार केला की, आपल्याला आपल्या मनातील क्रोध आपली विचारधारा आणि भारतभूमीच्या गरजांच्या आसपास कायम ठेवायचा आहे. एक अशी विचारधारा असावी, जिचं नैसर्गिक नातं इथले मुद्दे आणि समाजाची घडण यांच्याशी असलं पाहिजे. म्हणून जाती आणि समाज यासंबंधी जी समज कॉ. येचुरी यांना होती, ती आज खूप कमी लोकांत दिसून येते, हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळेच त्यांना वाटत होतं की, छोट्या छोट्या गोष्टींना जोडून घेतलं जावं. याच विचारांनुसार विरोधी आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढवू शकली.

येचुरी यांच्यासाठी संघर्ष केवळ एका निवडणुकीपुरता वा राजकारणापुरता विषय नव्हता, तर तो वैचारिक लढ्याचाही भाग होता.  

वैचारिकतेची लढाई एक वा दोन निवडणुकांतल्या जय-पराजयावर ठरवता येत नाही. येचुरी त्यांच्या स्वभावातील प्रेमभाव, त्यांच्या मांडणीतील तर्क, तथ्यं यांच्या साहाय्याने अधिकतर बैठकांत लोकांची एखाद्या मुद्द्यावर सहमती प्राप्त करून घ्यायचे. अनेकदा बैठकांत किंवा निवडणूक निकालानंतर आम्ही काहीसे शिथिल व्हायचो, तेव्हा ते म्हणायचे, ‘अरे, कॉम्रेड या गोष्टींमुळे काय फरक पडतो? निवडणूकच तर हरलोय, उमेद नाही हरून बसलो. उमेद कायम ठेवा, निवडणुका परत येणारच आहेत.’

.................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख ‘हिन्दुस्तान’ या वर्तमानपत्रात १३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रकाशित झाला आहे.

अनुवाद - विकास पालवे

vikas_palve@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......