हे पुस्तक लिहिण्यामागील एक हेतू हा होता की, आपल्या डोळ्यांवरील ‘इझम’चे, पारंपरिक समज-गैरसमजांचे काळे गॉगल उतरावेत...
ग्रंथनामा - झलक
रवि आमले
  • ‘परकीय हात : विदेशी हेरसंस्थांच्या भारतातील कारवाया आणि कारस्थाने’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 22 June 2024
  • ग्रंथनामा झलक परकीय हात Parkeey Haat रवि आमले Ravi Amale रॉ RAW

ज्येष्ठ पत्रकार व लेखक रवि आमले यांचं ‘परकीय हात : विदेशी हेरसंस्थांच्या भारतातील कारवाया आणि कारस्थाने’ हे नवंकोरं पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला लेखकाने लिहिलेलं हे मनोगत…

.................................................................................................................................................................

‘‘… तेव्हा भारतात हा ‘परकीय हात’ काम करत होताच. आजही करत आहे. तो स्वतंत्र पुस्तकाचा विषय ठरावा.’’

‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पुस्तकाच्या मनोगतातील हे वाक्य. ते पुस्तक २०१८मधले. ‘रिसर्च अँड ॲनालिसिस विंग’ या आपल्या गुप्तचरसंस्थेची यशोगाथा हे त्याचे स्वरूप होते. आपल्याकडील एका विशिष्ट वर्गात विदेशी गुप्तचरसंस्था, त्यातही खासकरून इस्रायलच्या ‘मोसाद’चे फार कौतुक. ते असायला हरकत नाही. पण त्या कौतुकात आपल्या गुप्तचर यंत्रणांना कमी लेखणे असे. ते खटकणारे.

रॉविषयी, तिच्या कारवायांविषयी काहीही माहिती नसताना, तिची तुलना मोसादशी करायची; ते मोसादवाले कसे अरब-मुस्लीम अतिरेक्यांना त्यांच्या देशात घुसून ठोकून काढतात आणि आपण कसे बुळे अशी कुजबूज करत आपल्याच देशाला नावे ठेवायची, असा तो सारा प्रकार असे. गेल्या ७०-७५ वर्षांत देशात काहीच झाले नाही, या कृतघ्न आणि अडाणी भावनेचाच तो एक भाग. तर त्यावरील प्रतिक्रियेतून रॉ या पुस्तकाची पहिली ठिणगी पडली. स्वाभाविकच त्या पुस्तकात रॉच्या यशाच्या कहाण्यांना प्राधान्य होते. त्याकरता वाचन, संशोधन करत असताना समोर इतरही बरीच माहिती येत होती.

रॉचा सगळाच इतिहास काही देदीप्यमान म्हणता येईल असा नाही. त्या संस्थेच्या नावाला काळीमा फासणाऱ्या घटनाही येथे घडून गेलेल्या आहेत. तेही कुठेतरी येणे आवश्यक आहे असे वाटत होते. दुसरीकडे परराष्ट्रांनी, त्यांच्या हेरसंस्थांनी भारतात केलेले उद्योगही ठोसपणे समोर येत होते. त्यातील काही उद्योग आपल्या हेरसंस्थांच्या साह्याने केलेले. काही आपल्या विरोधातले. राजनैतिक मुत्सद्दी, नेते, गुप्तचर अधिकारी यांची आत्मकथने, पुस्तके, संशोधन लेख, पेपर, ‘विकिलिक्स’, तसेच एडवर्ड स्नोडेन यांनी फोडलेली गोपनीय कागदपत्रे, खुद्द अमेरिकी हेरसंस्थांनी तेथील कायद्यानुसार जाहीर केलेली कागदपत्रे या सगळ्यांतून त्या ‘फॉरिन हँड’वर, ‘परकीय हाता’वर प्रकाश पडत होता.

त्याची एकत्रित नोंद व्हावी, तत्कालिन घटना-घडामोडी यांचे बिंदू एकमेकांना जोडून त्यातून भारतातील परकीय हाताची कारस्थाने आणि कारवाया, यांचे सलग चित्र समोर यावे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची ती बाजू मांडावी, असे रॉचे लेखन सुरू होते, तेव्हापासूनच मनात होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हा ‘परकीय हात’ तसा आपल्याला नवा नाही. इंदिरा गांधी यांचा काळ ज्यांनी अनुभवला आहे, त्यांना तर त्याचा चांगलाच परिचय असेल. आणीबाणी लागली, तेव्हा मी शाळकरीच होतो. तेव्हाच्या दोन आठवणी आहेत. एक म्हणजे आमच्या जीवन शिक्षण मंदिरातील गणेशोत्सवात रांगोळीने काढलेले ‘आले अनुशासन पर्व, वागू शिस्तीने सर्व’ हे वाक्य आणि नंतर ओतूरच्या बाजारपेठेतील भिंतीवर निळ्या शाईने लिहिलेली ‘अंधेरे में एक प्रकाश… जयप्रकाश, जयप्रकाश’ ही घोषणा. पण तेव्हाच्या काळात ‘परकीय हात’ हे एक ‘चलनी नाणे’ होते.

इंदिरा गांधी यांच्या प्रचारातील तो एक हुकमी एक्का होता. इतका की, त्याचा विनोदविषय झाला. पण पुढे कधी एखादा फितूर पकडला जाई, कुठे हेरगिरी कारवाया उघडकीस येत आणि विदेशी हेरसंस्थांच्या, परराष्ट्रांच्या हस्तक्षेपाची चर्चा कानावर येई. पंजाब-काश्मिरातील दहशतवाद, ईशान्येतील बंडाळी यातून तो दिसे.

महाविद्यालयात एक कम्युनिस्ट मित्र होता. पूर्वी डोंबिवलीत राहायचा तो. त्याच्या तोंडात सीआयएच्या अतिरेकी कारवाया नेहमी भिजत पडलेल्या असत. पण त्या पलीकडेही हा परकीय हात कार्यरत असतो. तो येथील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, एवढेच नव्हे, तर अगदी सांस्कृतिक बाबींनाही प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असतो, हे फारसे गावी नव्हते. पत्रकारिता करताना, येथील समाजकारण जाणून घेताना, आंतरराष्ट्रीय राजकारण, ‘इंटेलिजन्स’ या विषयांचा अभ्यास करताना या गोष्टींची समज येऊ लागली. अनेकांना मात्र आजही त्यावर विश्वास ठेवणे जड जाताना दिसते.

भारतात परराष्ट्रांच्या हेरसंस्था नाना उद्योग करतात यात खरे तर काहीही धक्कादायक नाही. फार पूर्वीपासून हे सुरू आहे आणि भारतीय हेरसंस्थाही अन्य देशांत तेच करत असतात. पाकिस्तानातील फुटीरतावादी चळवळींना, तेथील दहशतवादी संघटनांना रॉने केलेली मदत जगजाहीर आहे.

कॅनडातील खलिस्तानवाद्यांविरोधातील, श्रीलंकेतील, नेपाळमधील रॉच्या कारवाया हे उघड गुपीत आहे. तेव्हा विदेशी शक्ती भारतात हस्तक्षेप करतात म्हणून रडण्यात अर्थ नाही. आपल्या राष्ट्राचे हित, स्वार्थ साधणे आणि त्यासाठी प्रसंगी कोणत्याही थराला जाणे, हा हेरसंस्थांच्या कार्याचाच एक भाग असतो. आता त्यातील नैतिकता, अनैतिकता हा वेगळा मुद्दा. त्यावर वाद होऊ शकतो. पण तशीही हल्ली ही बाब संयुक्त राष्ट्रांचे व्यासपीठ, आंतररराष्ट्रीय परिसंवाद आणि मुत्सद्द्यांची चर्चा एवढ्यापुरतीच मर्यादीत राहिलेली दिसते. प्रत्यक्ष व्यवहारात ‘माय कंट्री… राईट ऑर राँग!’ हेच चाललेले असते.

जे भारत अन्यत्र करत होता, तेच अन्य देश भारतात करत होते. त्यातील काहींची वर्तणूक एक हात मैत्रीचा आणि दुसऱ्या हातात खंजीर अशीही होती. काही देश भारतविरोधी कारवाया करत होते, तशाच भारताच्या भूमीवरून एकमेकांविरोधातही लढत होते. एरवी या गोष्टी भारतीय इतिहासातील ‘फूट नोट्स’ म्हणूनही क्वचितच समोर येतात. परंतु नीट पाहिले, तर लक्षात येते की, या अशा कारवाया आणि कारस्थानांमध्ये भारताच्या इतिहासाला कुठे ना कुठे तरी वेगळे वळण लावण्याची क्षमता होती. तसे झालेही आहे.

एकूणच कोणत्याही राष्ट्रीय घटना, तत्कालिन राजकारण यास विविध कंगोरे असतात आणि ते त्या घटना वा राजकारण यांच्या लोकप्रिय मापनाहून खूपच भिन्न असतात. ‘परकीय हात’मधील प्रकरणे वाचताना हे नक्कीच जाणवेल. हे पुस्तक लिहिण्यामागील एक हेतू हाच होता की, डोळ्यांवरील ‘इझम’चे, पारंपरिक समज-गैरसमजांचे काळे गॉगल उतरावेत. राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक, अधिक खोल व्हावी. आपल्याकडील मास-मीडियाच्या चवचालपणामुळे झाले असे की, राजकारण म्हणजे केवळ सत्तेसाठीच्या साठमाऱ्या असेच चित्र उभे राहिले. पण त्या संघर्षामागेही काही वेगळी बले कार्यरत असतात. आणि ती देशाचे ‘राजकारण’ घडवत असतात. येथील निर्णयांवर, धोरणांवर, एवढेच नव्हे, तर लोकानुबोधावर, पर्सेप्शनवरही परिणाम करीत असतात. ‘परकीय हात’ हा त्याची जाणीव करून देण्याचा एक प्रयत्न आहे.

हे सारे मांडत असताना काही मर्यादा नक्कीच होत्या. एखादी फाईल गोपनीय आहे, याचा अर्थ त्यातील माहिती म्हणजे ब्रह्मसत्यच, असा एक समज उगाचच निर्माण झालेला असतो. गुप्तचरसंस्थांतील अधिकारी, त्यांचे विश्लेषक हे लिहितात ती काळ्या दगडावरची रेघ मानण्याचेही कारण नसते. कारण अखेरीस तीही माणसे असतात. त्यांची नोंदवलेली माहिती, त्यांची सूत्रे चुकीची वा अर्धवट असू शकतात. हीच बाब गुप्तचर अधिकारी वा मुत्सद्दी आदी मंडळींच्या लेखनाबाबतची.

अशा आत्मकथनांना अनेकदा स्वसमर्थनाचा आजार झालेला असतो. त्या आजारात तथ्ये अशक्त होतात. तेव्हा या सगळ्या माहितीकडे तारतम्याने पाहणे, ती इतर माहितीशी वा स्रोतांशी ताडून पाहणे, हे आवश्यक ठरते. जेथे ते अजिबातच अशक्य, तेथे त्या घटना वजा करणे हेच योग्य असते. या पुस्तकाच्या लेखनात आवर्जून तसा प्रयत्न केला आहे. त्याबाबत कुठे शंका निर्माण झालीच, तर हे लक्षात घ्यावे, की कोणत्याही लेखनास लेखकाच्या वैचारिकतेची, अनुभवाची, विश्लेषक शक्तीचीही मर्यादा असतेच.

हे लिहीत असताना अशी काही गूढ ठिकाणे आली, की जेथे खऱ्या-खोट्याचा साधा अंदाजही लावणे कठीण होते. इस्रोतील हेरगिरी प्रकरण हे त्यातीलच एक. त्यामुळेच त्याचा समावेश या पुस्तकात करावा की काय याबाबत द्विधा मनस्थिती होती. मात्र काहीही असले, तरी त्या हेरगिरी प्रकरणाने भारतीय अंतराळ कार्यक्रमावर मोठा परिणाम झाला. विदेशी शक्तींना आणखी काय हवे असते? त्यामुळेच त्याचा समावेश येथे केला.

या आणि खरे तर एकूणातच इतिहास लेखनाची ही एक मर्यादा असते की, आज हाती असलेल्या माहिती आणि पुराव्यांवरूनच त्याचे लेखन करावे लागते. उद्या त्या माहितीत आणखी भर पडली, काही नवे पुरावे समोर आले, तर आजचे कथन बदलावे लागते, सुधारून घ्यावे लागते. तेव्हा हेच काय ते अंतिम सत्य असे मानण्यात अर्थ नसतो.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

पुस्तकाच्या या मर्यादेची कबुली देतानाच, हेही सांगायला हवे की, परकीय हाताच्या या बखरीतून आजवर आपण मनाशी जपलेल्या अनेक कथा-कहाण्यांना, प्रतिमांना तडे जाण्याची शक्यता आहे. मनोमन त्याचीही तयारी ठेवायला हवी. हे पुस्तक लिहिण्यामागे कोणाचे प्रतिमासंवर्धन करणे वा चारित्र्यहनन करणे हा हेतू नाही. पण तरीही तसे काही होत आहे असे वाटल्यास, त्याचे कारण तत्कालीन घटना-घडामोडींत, त्या व्यक्तींच्या तेव्हाच्या वर्तनात शोधावे लागेल.

जगभरात शांततेची, नैतिकतेची भाषणे देणारे पं. जवाहरलाल नेहरू हे चीनशी मैत्रीचा हात पुढे करीत असताना तिबेटी बंडखोरांना शस्त्रपुरवठा करीत असतात, दलाई लामांना आसरा देत असतात आणि चीन हा आपला संभाव्य शत्रू क्रमांक एक आहे, अशी नोट इंटेलिजन्स ब्युरोला पाठवत असतात.

हे नेहरूंच्या प्रतिमेला जसा तडा देते, त्याच प्रकारे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे ब्रिटिश गुप्तचर यंत्रणांचे सहकार्य घेत असतात आणि काँग्रेस पक्षातील काही ‘अतिरेकी प्रवृत्तीं’वरील पाळत सुरुच ठेवण्यास आयबीला संमती देत असतात, ही गोष्टही पटेलांच्या प्रतिमेशी विसंगत ठरते. पण ही ऐतिहासिक तथ्ये सुटी सुटी पाहण्यात अर्थ नसतो. ती तेव्हाच्या काळाच्या, परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तेव्हाचे संदर्भ लक्षात घेऊनच पाहायची असतात. अन्यथा त्यातून अर्धसत्ये आणि अपमाहितीची पिलावळ जन्मास येते.

‘परकीय हात : विदेशी हेरसंस्थांच्या भारतातील कारवाया आणि कारस्थाने’ – रवि आमले

मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने – ४७२ | मूल्य – ५९९ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......

‘धर्म, राजकारण आणि अन्य प्रश्नांचा धांडोळा’ : आसपासच्या उलथापालथीने अस्वस्थ होणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या आस्थेच्या प्रश्नांची चर्चा करणारे हे पुस्तक आहे...

गेल्या दहा वर्षांत याबाबत विरोधाभासाचे राजकारण होतेय, ते प्रतिमांच्या व्यक्तिकेंद्रित आभासात जनमानसाच्या लक्षातच येत नाही, ही चिंतेची बाब आहे. पोकळ घोषणांच्या झुल्यावर झळकणारे समाजमन भव्य दिव्य सूचित करण्याचा आभासीकेत अडकले आहे. बधीर झाले आहे. धार्मिक उन्मादात सामाजिक ताणतणाव वाढत आहेत. धार्मिक प्रदूषणाला नैतिकतेच्या आवरणाखाली धर्मभोळेपणाचा राजकीय मुलामा देऊन वाटचाल सुरू आहे.......