स्त्रिया आणि इतर शोषित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी सजग असणाऱ्या, करुणा आणि मानवता यांना पारख्या न झालेल्या हिंदी साहित्याने मला खूप प्रभावित केलं…
ग्रंथनामा - आगामी
जयप्रकाश सावंत
  • ‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 30 August 2023
  • ग्रंथनामा आगामी भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा ‌Bhaiyya Express aani Itar Katha जयप्रकाश सावंत Jayprakash Sawant

प्रसिद्ध हिंदी-मराठी अनुवादक जयप्रकाश सावंत यांचं ‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ हे अनुवादित पुस्तक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होत आहे. यात हिंदीतील दहा महत्त्वाच्या लेखकांच्या सतरा कथांचा अनुवाद आहे. शब्द पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकाला सावंत यांनी लिहिलेलं हे मनोगत….

..................................................................................................................................................................

वाढतं वय आणि त्याला जोडून येणाऱ्या व्याधी यांतून अगदी मुंबईतल्या मुंबईत होणाऱ्या प्रवासावरसुद्धा ज्या मर्यादा आल्या, त्यातून गेली काही वर्षं माझं फोर्टमधल्या ‘पीपल्स बुक हाऊस’ला जाणं बंद झालंय. त्याचा मला सर्वांत हळहळ वाटायला लावणारा परिणाम म्हणजे माझा हिंदी नियतकालिकांशी असलेला संबंध पूर्णपणे संपुष्टात आलाय. अगदी थोड्याच वर्षांपूर्वी मी दर महिन्याला ‘पीपल्स’मध्ये जाऊन ‘पहल’, ‘तद्भव’, ‘हंस’, ‘कथादेश’, ‘वागर्थ’, ‘साक्षात्कार’, ‘उद्भावना’ अशी दहा-बारा नियतकालिकं नियमित पाहत होतो. मला नियतकालिकांविषयी नेहमीच फार प्रेम वाटत आलंय.

ऑर्वेलने एके ठिकाणी म्हटलंय की, एखाद्या तद्दन मूर्ख मासिकाचा वर्षभराचा बांधीव अंकही काही काळानंतर बहुसंख्य पुस्तकांपेक्षा जास्त वाचनीय वाटतो. ते मला भावतं. नियतकालिकं मला विविधरंगी फुलांच्या गुच्छांसारखी वाटतात. एखाद्या अंकातली सर्वच फुलं आवडीची निघाली, तर बहारच असते, पण चांगल्या संपादकाने काढलेल्या नियतकालिकात थोड्या तरी आवडत्या गोष्टी मिळतातच. शिवाय दर महिन्याला एखादी तरी चांगली नवजात कविता किंवा कथा वाचायला मिळते. मराठीत सुरुवातीला ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’, ‘वसुधा’, ‘वीणा’ आदी, आणि नंतरच्या काळात ‘सत्यकथा’ अशा मासिकांचा लागलेला नाद आठवतो.  

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात मराठी नियतकालिकं क्षीण होत असताना अचानक मला वर उल्लेख केलेल्या हिंदी नियतकालिकांचा शोध लागला आणि त्यांच्या श्रीमंतीने मी हरखून गेलो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठीतले आघाडीचे लेखक फक्त दिवाळी अंकांत दिसू लागल्याच्या त्या काळात विनोदकुमार शुक्ल, विष्णु खरे, चंद्रकान्त देवताले, मंगलेश डबराल, अशोक वाजपेयी, असग़र वजाहत, विष्णु नागर, शिवमूर्ति, उदय प्रकाश, जितेन्द्र भाटिया, अखिलेश असे हिंदीतले नामवंत कवी-लेखक, त्यांच्यानंतरच्या दोन पिढ्यांतल्या तरुण लेखकांसोबत हिंदी मासिकांतून वाचायला मिळतायत, हे दृश्य आगळं होतं. या साहित्याचं स्वरूपसुद्धा अनोखं होतं.

महाराष्ट्रात आपल्याला महात्मा जोतीबा आणि सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, न्या. रानडे, साने गुरुजी असे थोर समाजसुधारक आपल्याकडे होऊन गेल्याचा अभिमान असतो. खरं तर ते खरोखरच होऊन गेले की, तो केवळ आभास होता, असा प्रश्न पडावा, अशी आजची विषण्ण करणारी स्थिती आहे.

असो. पण या महामानवांच्या विचारांचा मुख्य धारेतल्या मराठी साहित्याला किती स्पर्श झालाय, हे पाहू गेल्यास हाती काय लागेल? याउलट, अशा सुधारकांच्या बाबतीत जे पिछाडीला आहेत, असं आपल्याकडच्या अहंकारातून मानलं जातं, त्या हिंदी भाषकांचं साहित्य बव्हंशी पुरोगामी, प्रगतिशील असल्याचं मला आढळलं. केवळ स्वतःच्या भावभावनांच्या हिंदोळ्यांवर न झुलणारं, आपल्या जातीपुरतं किंवा वर्गापुरतं मर्यादित नसणारं, स्त्रिया आणि इतर शोषित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी सजग असणारं, करुणा आणि मानवता यांना पारखं न झालेलं – अशा प्रकारच्या या हिंदी साहित्यानं मला खूप प्रभावित केलं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

त्यातल्या उत्कृष्ट कथा, कविता निवडून त्या मराठीत आणणं, हा या दोन्ही भाषांच्या न फिटणाऱ्या ऋणातून अंशतः उतराई होण्याचा मार्ग आहे, असं मला वाटलं आणि त्यातून हे अनुवाद सुरू झाले.

सुरुवातीला उदय प्रकाश यांच्या कथांच्या केलेल्या अनुवादाला चांगला प्रतिसाद लाभला. सुमती लांडे यांनी प्रकाशित केलेलं ‘तिरिछ आणि इतर कथा’ लोकप्रिय झालं – विशेषतः मराठीतल्या तरुण कवी-कथाकारांना ते खूप आवडून गेलं. त्यानंतर केलेले रघुनंदन त्रिवेदी यांच्या कथांचे अनुवादही वाचकांना आवडले. यामुळे मला एकूणच समकालीन हिंदी कथेचं एक चित्र समोर आणावं, असं वाटलं.

२०१०च्या मे महिन्यात आरंभ झालेल्या ‘मुक्त शब्द’ या मनाजोगत्या स्वरूपाच्या मासिकामुळे हा विचार प्रत्यक्षात येऊ शकला. २०१०-११च्या दरम्यान मी हिंदीतील आठ कथाकारांच्या बारा कथांचे अनुवाद करून ‘मुक्त शब्द’ला दिले आणि त्या मासिकाच्या येशू पाटील यांनी ते अगत्याने छापले. हिंदी साहित्याला जास्त महत्त्व दिल्याबद्दल ज्येष्ठ लेखक गो. पु. देशपांडे यांनी व्यक्त केलेली नाराजी सोडल्यास या योजनेलाही चांगला प्रतिसाद लाभला. विज्ञान कथाकार सुबोध जावडेकर यांची ‘मुक्त शब्द’च्या पत्रव्यवहार सदरात आलेली अत्यंत उमदी प्रतिक्रिया कृतज्ञतापूर्वक लक्षात राहिलीय. त्यांनी लिहिलं होतं, ‘हिंदी कथांचा अनुवाद देणे तत्काळ बंद करावे. कारण मराठी कथाकारांना कॉम्प्लेक्स येईल, अशी भीती वाटते.’

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

त्या बारा कथा आणि नंतरच्या काळात अनुवादित केलेल्या आणखी काही कथा, अशा एकूण बारा कथालेखकांच्या बावीस कथा मी ‘मुक्त शब्द’ला देऊ शकलो. त्यांतल्या उदय प्रकाश आणि रघुनंदन त्रिवेदी यांच्या कथा वगळून उरलेल्या दहा कथाकारांच्या एकूण सतरा कथा प्रस्तुत संग्रहाद्वारे पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत. हा संग्रह काढायचा ठरल्यानंतर प्रत्यक्षात तो प्रकाशित व्हायला अनेक वर्षं लागलीयत, पण इतक्या ‘देरी’नंतरही तो वाचकांना ‘दुरुस्त’ वाटेल, अशी मला आशा आहे.

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ - अनुवाद : जयप्रकाश सावंत

शब्द पब्लिकेशन, मुंबई | मूल्य - ३८५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......