संगीत ही अशी कला आहे, जी शिकताना गुरूच्या, शिकवताना शिष्याच्या, सादर करताना श्रोत्यांच्या किंवा आस्वाद घेताना सादरकर्त्याच्या ‘धर्माचं’ विस्मरण होतं…
ग्रंथनामा - झलक
लोकेश शेवडे
  • अश्विनी भिडे-देशपांडे, मालिनीताई राजुरकर, उल्हास कशाळकर, उदय भ‌वाळकर, ‘स्वरभाषिते’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ, दिनकर पणशीकर, श्रुती सडोलीकर-काटकर, नयन घोष, शंकर अभ्यंकर आणि यशवंतबुवा जोशी
  • Tue , 04 July 2023
  • ग्रंथनामा झलक स्वरभाषिते Swarbhashite मालिनीताई राजुरकर Malini Rajurkar उल्हास कशाळकर Ulhas Kashalkar उदय भ‌वाळकर Uday Bhawalkar दिनकर पणशीकर Dinkar Panshikar श्रुती सडोलीकर-काटकर Shruti Sadolikar Katkar अश्विनी भिडे-देशपांडे Ashwini Bhide-Deshpande यशवंतबुवा जोशी Yashvantbuva Joshi शंकर अभ्यंकर Shankar Abhyankar नयन घोष Nayan Ghosh

भारतीय शास्त्रीय संगीतातील मालिनीताई राजुरकर, उल्हास कशाळकर, उदय भ‌वाळकर, दिनकर पणशीकर, श्रुती सडोलीकर-काटकर, अश्विनी भिडे-देशपांडे, यशवंतबुवा जोशी, शंकर अभ्यंकर, नयन घोष अशा नऊ कलावंतांच्या मुलाखतींचा समावेश असलेलं ‘स्वरभाषिते’ हे रोहिणी गोविलकर यांचं पुस्तक नुकतंच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला लेखक-नाटककार लोकेश शेवडे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

प्राचीन काळापासून संगीत, नृत्य, नाट्य, कला, साहित्य या सर्व क्षेत्रांमध्ये उर्वरित जगाशी तुलनीय गती राखत, स्वतंत्र वाटचाल साधलेल्या भारतीय उपखंडाला दस्तऐवजीकरणाबाबत मात्र प्राचीन काळापासूनच वावडं असल्याचं दिसून येतं. त्यामुळे कोणत्याही कलेची वाटचाल नेमकी कशी होत गेली, याबाबत अभ्यासकांना तर्क आणि अंदाजांवर अवलंबून राहावं लागतं. भारतीय संगीताच्या बाबतीत ही बाब अगदी चपखलपणे लागू पडते.

सुरुवातीला दिलेलं छायाचित्र विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचं आहे. ते अनवधानाने दिलं गेलं. या पुस्तकात उल्लेख मुलाखत असलेल्या ज्येष्ठ सतारवादक पं. शंकर अभ्यंकर यांची ही छायाचित्रं. चुकीबद्दल दिलगीर आहोत. - संपादक

.................................................................................................................................................................

श्रुतिस्थानं, स्वरस्थानं - त्यातून निर्माण होणारे थाट, राग, रागिणी- त्यांचे वादी-संवादी-विवादी- वर्ज्य-वक्री स्वर, आरोह-अवरोह स्वरावली, पकड, ताल, लय अशा अनेकविध नियम-उपनियमांनी करकचून बांधलेलं, पण त्या निर्बंधांच्या कुंपणाच्या आत गायक-वादकाला विहाराचं-विचारांचं-आविष्काराचं संपूर्ण स्वातंत्र्य असलेलं असं ‘शास्त्रीय’ संगीत पृथ्वीतलावर दुसरं नसेल. बुद्धिबळात जसे उंट, घोडा, हत्ती, प्यादं, वझीर अशा प्रत्येक सोंगटीच्या स्थानांना आणि चालींना नियम आहेत, अन्यही अनेक बंधनं आहेत. मात्र ते नियम, बंधनं पाळून पटावरचा पुढचा खेळ पूर्ण मुक्त आहे... हजारो वर्षं हजारो लोक खेळत आहेत.

पण तरी प्रत्येक मातब्बराच्या खेळ्या, त्याच्या चाली, शैली भिन्न आहेत आणि वरून नवनवीन खेळ्या विकसित होतच आहेत, त्या वेगळ्या असंच काहीसं उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचं आहे. मात्र उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचा पट बुद्धिबळ किंवा कोणत्याही खेळापेक्षा अधिक कठोर निर्बंध असलेला पण अधिक मुक्तता असलेला अधिक रंगतदार आणि अधिक विस्तीर्ण आहे. याखेरीज या पटावरचे नियम आणि निर्बंधदेखील वेळोवेळी बदलत गेले आहेत, ते अलाहिदा.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

भरतमुनीं-मतंगमुनींपासून शारंगदेवपर्यंत आणि अमीर खुश्रो- तानसेनपासून सदारंग (नैमत खान)- अदारंग (फिरोझ खान) अशा असंख्य दिग्गजांच्या प्रभावांमुळे गंधर्वगान-धृपद-थाट अशी स्थित्यंतरं घडत पुढे बडा खयाल, छोटा खयाल (चीज), तराणा, तिरवट, रासपर्यंत आणि विविध लोकसंगीताच्या प्रभावामुळे टप्पा, ठुमरी, होरी, कजरी, गजलपर्यंत - किंबहुना मराठी नाट्यसंगीतापर्यंत उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत येऊन ठेपलं आणि पुढे बॉलिवुडमध्येही मुसंडी मारत गेलं. या प्रदीर्घ विलोभनीय प्रवासातील गेल्या शतकाच्या प्रारंभापर्यंतचे पुरेसे दस्तावेज उपलब्ध नाहीत. तथापि, अनेक दिग्गजांनी आयुष्य वेचून संशोधन करत आजतागायत बरीच माहिती खणून काढली, अद्यापही नवनवी माहिती मिळवत आहेत, ही समाधानाची बाब.

गेल्या शतकाच्या साठोत्तरी दशकापर्यंत ध्वनिवर्धन, ध्वनिमुद्रणाचे प्रकार, सभागृह याबाबत बरीच उलथापालथ झाल्यामुळे, तीन महत्त्वाचे परिणाम झाले. एक म्हणजे शास्त्रीय संगीताचा श्रोतृवर्ग वाढला. त्यामुळे मैफली बांधण्याची पद्धत श्रोताभिमुख – ‘मॉड्युलर’ बनली. दुसरा- शिक्षणाची गुरुकुल पद्धत मावळत जात, संगीतातल्या घराण्यांचं महत्त्व अस्ताकडे गेलं आणि तिसरा- नवनवीन प्रयोग, नवीन राग, जोड राग, अनवट राग-शैली यांचं ध्वनिमुद्रण होऊ लागल्यामुळे ते जतन होऊ लागलं. अर्थात, अन्य कोणत्याही कलेसारखंच भारतीय संगीताचं स्वरूपही गेल्या शतकात वाहतंच राहिलं. पण या काळात भारतीय संगीतान घेतलेली वळणं पूर्वीपेक्षा संख्येनं आणि वेगानं अधिक होती.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

यापैकी बहुतांश प्रयोगांचं-वळणांचं सांगीतिक मुद्रण सुदैवानं त्या त्या वेळी झालं, तरी ते प्रयोग करण्यामागचे कलाकारांचे विचार, ते प्रयोग करताना, वेगवान वळणं घेताना-त्यांचे कलाकारांच्या आयुष्यावर झालेले विविधांगी परिणाम, कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेकविध बाबींमुळे, कलाकारांच्या परस्पर नातेसंबंधांमुळे त्यांच्या विचारांवर, कलेवर, सादरीकरणावर झालेले परिणाम, असा सर्वंकष आढावा घेणं दुरापास्त असल्यामुळे तो घेऊन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम फारसं झालं नाही. रोहिणी गोविलकरांनी घेतलेल्या मुलाखतीतून हाच आढावा आपोआप साकारत जातो.

मागील शतकाच्या मध्यापासून पुढे ‘माईलस्टोन’ ठरलेल्यांपैकी काही गायकांच्या-कलाकारांच्या मुलाखती रोहिणी गोविलकरांनी घेतल्या आहेत. त्यापैकी पं. यशवंतबुवा जोशी, पं. शंकर अभ्यंकर, पं. दिनकर पणशीकर, विदुषी मालिनीताई राजूरकर, यांच्या संगीत शिक्षणाची सुरुवात शतकाच्या पूर्वार्धात झालेली आहे. तर पं. उदय भवाळकर, पं. उल्हास कशाळकर, विदुषी श्रुती सडोलीकर, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या संगीत शिक्षणाची सुरुवात शतकाच्या उत्तरार्धात झाली आहे.

या मुलाखतींत कलावंतांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घराणी, गुरुकुल पद्धत यांची वर्णनं आली आहेत आणि त्यासोबत अजमेर संगीत शाळा, धृपद केंद्र, गंधर्व महाविद्यालय, संगीत रिसर्च अकॅडमी, अशा स्वतंत्र संस्था, अन्य घराण्यांशी संवाद-सांगीतिक देवाणघेवाण इत्यादी बाबींचेही तपशीलवार उल्लेख आहेत. शिवाय पं. देवधर मास्तर, पं. गजाननबुवा जोशी, पं. गुणिदास, पं. फिरोझ दस्तूर, पं. गुलुभाई जझदानवाला अशा नामांकित गुरुजनांच्या आणि पं. बडे गुलाम अली, गझल सम्राज्ञी बेगम अख्तर, पं. डागर बंधू, पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, विदुषी माणिक वर्मा, अशा उत्तुंग कलावंतांच्या अनुभवांचे संदर्भही आले आहेत.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

या मुलाखतींतून ठळकपणे लक्षात येणाऱ्या दोन गोष्टी नमूद करणं अनिवार्य आहे. एक म्हणजे पं. देवधर मास्तर- पं. गजाननबुवा जोशी यांच्या गुरुस्थानाबाबत, गंधर्व महाविद्यालय-संगीत रिसर्च अकॅडमी या संस्थांच्या संगीत संवर्धनाबाबत आणि पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी यांच्या उत्कृष्ट गायनाबाबत मुलाखत घेतलेल्या बहुतांश कलावंतांकडून कुठे ना कुठे आदरपूर्वक कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला गेला आहे. याचा अर्थ, या संस्था, हे गुरुजन आणि आणि हे कलावंत किमान ५०-७५ वर्षं शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर अढळ राहिले, इतकी त्यांच्या कर्तृत्वाची व्याप्ती आहे.

दुसरी नमूद करण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखत घेतलेल्या बहुतांश कलावंतांना उत्कृष्ट ‘संगीत’ हे ‘ईश्वरी’ संकल्पनेशी निगडित वाटतं. असं असूनही त्यांना संगीत सादर करताना श्रोत्यांचा धर्म किंवा ऐकताना सादरकर्त्याचा धर्म आठवत नाही. किंबहुना, त्यांच्या गुरू-शिष्य नात्यामध्ये, अगदी संगीताच्या गुरुकुल पद्धतीतदेखील गुरू-शिष्यांना परस्परांचा धर्म कधी आड आला नाही.

ज्येष्ठ गायिका विदुषी श्रुती सडोलीकर याच पुस्तकातल्या एका मुलाखतीत म्हणतात, “संगीतात कुठल्याही जाति-धर्माशी न जोडता मिळणारा आनंद आहे. हा मुसलमान आनंद, हा हिंदू आनंद, हा ख्रिश्चन आनंद असं काही नसतं… स्वर सुंदर लागल्यावर आतून ज्या ऊर्मी निर्माण होतात, त्याला कुठली जात, भाषा, धर्म नसतो.”

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

याचा अर्थ, संगीत ही अशी कला आहे, जी शिकताना गुरूच्या, शिकवताना शिष्याच्या, सादर करताना श्रोत्यांच्या किंवा आस्वाद घेताना सादरकर्त्याच्या ‘धर्माचं’ विस्मरण होतं आणि ‘ईश्वराचं’ स्मरण होतं! अशी ही अद्भुत ‘स्मरण-विस्मरण’ शक्ती असलेलं भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पोहोचवणं, हे सुज्ञांचं एक आद्यकर्तव्य ठरतं आणि त्यासाठी त्याचा गेल्या अर्धशतकाचा आढावा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणंदेखील!

दिग्गज कलावंतांच्या मुलाखतींद्वारे तो समग्र आढावा साध्या-सोप्या भाषेत मांडणारं, हे पुस्तक पुढच्या अनेक पिढ्यांना अत्यंत मोलाचा ‘दस्तऐवज’ ठरेल, यात शंका नाही.

‘स्वरभाषिते’ – रोहिणी गोविलकर

अक्षर प्रकाशन, मुंबई | पाने – २३१ | मूल्य – ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......