पुस्तकाचे पान हे रस्त्यावरच्या एखाद्या नाक्यासारखे असते. तिथली सारी पात्रे वाचकाच्या आगमनाची वाट पाहत असतात. फक्त वाचकाला आईसारखे काळ-वेळ ओलांडत तिथे जाता आले पाहिजे...
ग्रंथनामा - जागतिक पुस्तक दिन
रवींद्र कुलकर्णी
  • लेखक रवींद्र कुलकर्णी यांच्या आई
  • Fri , 23 April 2021
  • ग्रंथनामा जागतिक पुस्तक दिन World Book Day २३ एप्रिल 23 April ययाती वि. स. खांडेकर इरावती कर्वे युगान्त महाभारत पु. ग. सहस्त्रबुद्धे व्यंकटेश माडगूळकर नरहर कुरुंदकर

माझे वाचनाचे खूळ आईकडून आलेले आहे, याची मला आता खात्रीच होत आली आहे. घरात मी आधी पुस्तके आणायला सुरुवात केली की आईने या प्रश्नाचे उत्तर ‘मी’ असे आहे. तिच्या मनात पहिल्यापासूनच ते असावे आणि मी पुस्तके आणू लागताच तिच्या वाचनाच्या नादाला जागा मिळाली.

ती कर्नाटकातल्या जमखंडीतून महाराष्ट्रात आली. लग्नाआधी ती कन्नड शाळेत शिक्षिका होती. सारे शिक्षण कन्नडमधून झालेले असले तरी मराठी भाषा तिला अपरिचित नव्हती. जमखंडीत कन्नड-मराठी असे मिश्र वातावरण होते. तिथल्या कन्नड भाषेला मराठी टोन आहे आणि मराठीला कन्नड हेल आहे. गणेशोत्सवातदेखील मराठी आणि कन्नड असे मिश्र कार्यक्रम होत. मात्र तिला लग्नाआधी सफाईदारपणे मराठी वाचता येत नसावे. सासरी मराठीकडे झुकणारे वातावरण होते. डोंबिवलीत कन्नड भाषिकांची संख्या बऱ्यापैकी होती. तिथे कर्नाटक संघाचे लहानसे वाचनालय होते. तिकडून ती काही घेऊन येई. पण त्यात काही फारसे दर्जेदार नसावे. त्या वाचनालयात शिवराम कारंथ, वा. सी. बेंद्रे अशा काही अभिजात कन्नड साहित्यिकांची छायाचित्रे लावलेली होती. त्यांचे अभिजातपण तेव्हा काही मला समजत नसे. त्यांची पुस्तकेदेखील तिथे नसावीत. कारण तिच्याकडून कारंथ-बेंद्रे अशी नावे ऐकलेली मला आठवत नाहीत. दुय्यम-तिय्यम दर्जाचे साहित्य तिथे असावे, पण वाचणाऱ्याला त्याची भूक भागणे आवश्यक असते. त्यामुळे तिथले काही ती वाचत राही.

मराठी माध्यमात शिकणाऱ्या आम्हा भावंडांमुळे मराठीची तिला सवय होत गेली आणि कन्नड वाचन मागे पडले. तरीही मराठी पुस्तके तिने स्वत:हून वाचनालयातून आणली नाहीत. पण नंतर वाचनाचे खूळ मला लागले आणि मी जे आणे त्यातले काही ती वाचत राही. शाळेत असताना वि. स. खांडेकरांचे वेड अनेकांप्रमाणे मलाही होते. ते लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे पाठ्यपुस्तक होते. त्यात दरवर्षी त्यांच्या लेखनातले काही ना काही असे. एका ठराविक इयत्तेपर्यंत त्यांच्या कादंबऱ्यांतले उतारेच्या उतारे माझ्या वह्यांत दिसत असत. त्यात त्यांना नुकतेच ‘ज्ञानपीठ’ मिळाले होते. ‘कांचनमृग’, ‘क्रौंचवध’, ‘अमृतवेल’ अशा त्यांच्या कादंबऱ्या वाचण्याचा मी सपाटाच लावला होता. त्यातले मराठी सोपे होते. आईला ते जमू लागले व आवडूही लागले. त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीची परायणे तिने केली.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अनेक वर्षांनी नरहर कुरुंदकरांचा ‘ययाती’वरचा लेख हाताला लागला. त्यात खांडेकरांचा ‘ययाती’ महाभारतातल्या मूळ ‘ययाती’पेक्षा कसा वेगळा आहे, हे त्यांच्या शैलीत सांगितले आहे. उलट काही बोलायला त्यांनी जागाच ठेवली नव्हती. तो लेख मी तिला वाचायला दिला. त्यानंतर ‘ययाती’चे तिचे वेड कमी झाले. त्यानंतर अनेक वर्षांनी तिने ते एकदा परत वाचायला घेतले होते, पण ती त्यात रमली नाही. थोडे वाचून ते तिने सोडून दिले. जुने ‘ययाती’ तिने हाताळून सैल होऊन गेले होते. म्हणून मी नवीन आणले, तर ते तसेच पडून राहिले.

उत्तर कर्नाटकाला पु. ल. देशपांडे अपरिचित नव्हते. मुंबई-पुण्याकडचा माणूस पु.ल. जास्त सहज एन्जॉय करतो, तसे तिनेही केले. पण त्यातलेदेखील त्यांचे ‘ऑफ बीट’ लेख तिला जास्त आवडतात. ‘व्यक्ती आणि वल्ली’मधल्या नंदा प्रधानसारखे. त्यांच्या विनोदी लेखांपेक्षा भावूक वर्णन करणारे लेख अजूनही ती कधीतरी वाचते. त्यांच्या ‘गुण गाईन आवडी’बरोबरच ‘वंगचित्रे’ आणि ‘गांधी’देखील तिला पसंत आहे. व्यंकटेश माडगूळकरांची गोडी लागावी म्हणून ‘करुणाष्टक’ तिला दिले. ते तिने आवडीने वाचले, तेही अनेकदा. त्यांच्या प्राणीविषयक लेखनात मात्र मी प्रयत्न करूनदेखील ती रमली नाही. ‘सिंहांच्या देशात’ थोडे वाचले आणि सोडून दिले. त्यांचेच ‘चित्रे आणि चरित्रे’ तर फक्त चाळले. गो. नी. दांडेकरांचेही असेच झाले. ‘स्मरणगाथा’ आणि ‘भ्रमणगाथा’ वाचले आणि त्यांच्या निसर्गाची वर्णने असलेल्या कादंबऱ्यांवर तिने फुली मारली. ‘स्मृतिचित्रे’ तिने वाचले आणि जवळ केले. पण ‘आहे मनोहर तरी’ थोडे वाचले आणि सोडून दिले.

श्री. ज. जोश्यांनी आनंदीबाईंवर लिहिल्यामुळे तिला ते पसंत आहेत. पंडिता रमाबाई आणि आनंदीबाई जोशी या तिच्या रोल मॉडेल असाव्यात असे मला वाटते. सरोजिनी वैद्यांच्या ‘संक्रमण’ या पुस्तकातले त्यांच्यावरले लेख बऱ्याचदा ती वाचत असते. लग्नानंतर पुढे शिकायला मिळेल असे सासरच्यांनी आईला कबूल केले होते, मात्र त्याकडे नंतर दुर्लक्ष झाले, असे एकदा पुसटसे तिने बोलून दाखवले आणि मला तिच्या ‘संक्रमण’वरच्या प्रेमाचा उलगडा झाला.

तिला आवडलेल्या पुस्तकांबद्दलदेखील माझे आणि तिचे एक-दोन वाक्यांपलीकडे बोलणे होत नाही. मी अंदाजाने पुस्तक सुचवतो आणि तिच्या हातात देतो. कधी तिला त्यातले एखादे आवडते. मला ते कळण्याचे साधन म्हणजे ती फोनवरून बहिणींशी बोलताना त्याचा उल्लेख थोडक्यात करते आणि नंतर ते अनेकदा वाचत असते. ‘विश्रब्ध शारदा’मधली आनंदीबाई जोशींनी गोपाळरावांना लिहिलेली पत्रे तिने वाचली आणि त्याबद्दल बहिणीला सांगताना मी ऐकले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मी एखादे पुस्तक वाच असा आग्रह केला आणि जर तिला पहिल्या काही पानांत नाही आवडले तर ती वाचत नाही. स्वभावाने खट आहे. शिक्षिका म्हणून राहिली असती तर मुख्याध्यापक झाली असती! एकमेकांच्या वाचनावर आमचे लक्ष असते. आजकाल माझा वेळ पुस्तकांपेक्षा मोबाईलवर जास्त जातो, हे तिने माझ्या वाचनाचे कौतुक करणाऱ्या व्यक्तीला ऐकवले.

‘महाभारत’ हा मात्र तिच्या आवडीचा विषय आहे. एकेकाळी ती ‘मृत्युंजय’ वाचत असे, पण नंतर ‘महाभारत - एक सूडाचा प्रवास’, ‘व्यासपर्व’ हे तिला पसंत पडले. ती रमली मात्र इरावतीबाईंच्या ‘युगान्त’मध्ये. तिने ते पहिल्यांदा वाचून ३०-३५ वर्षे तरी झाली असावीत. आजही ते पुस्तक दर दोनेक महिन्याने तिच्या हातात आठवडाभर तरी बघतो. एकदा मी तिला विचारले, ‘त्यातले तू सारखे काय वाचतेस?’ ती म्हणाली, ‘युगान्त म्हणजे काय, हे त्यात सांगितले आहे, ते!’ हे त्यातले शेवटचे प्रकरण आहे. शिवाय त्यातल्या गांधारी आणि द्रौपदी या तिच्या आवडत्या व्यक्तिरेखा आहेत, असेही ती म्हणाली. एक, नवरा आंधळा म्हणून स्वत:चे डोळे बांधून घेणारी, तर दुसरी आपल्या नवऱ्याचे डोळे उघडावेत म्हणून प्रयत्न करणारी! परस्परविरोधी आणि एकमेकांच्या विरोधी पक्षात असलेल्या या दोन्ही व्यक्तिरेखा आईला भावतात, हे ऐकून मला वाटते की, बरोबर-चूक किंवा चांगले-वाईट याच्या पलीकडचे तिला काही कळलेले आहे.

एकदा पु. ग. सहस्त्रबुद्धे यांचे निबंध वाचताना तिने ते मध्येच मिटले आणि म्हणाली, “यात म्हटले आहे की, रामाच्या जागी कृष्ण असता तर त्याने दशरथाची वनवासात जाण्याची आज्ञा पाळण्याऐवजी त्याला अटक केली असती. मलाही नेहमी नेमके हेच वाटायचे.” रिव्हिलेशनची चमक क्षणभर तिच्या चेहऱ्यावर तरळून गेली. पु.गं.चे आणि तिचे खरे होते. स्वत:च्या बापाला अटकेत टाकायचा मक्ता फक्त मुघलांनी घ्यावा असे थोडेच आहे?

श्री. ज. जोशी यांच्या ‘पुणेरी’तले किंवा वि. द. घाटे यांच्या ‘पांढरे केस हिरवी मने’ यातले विसाव्या शतकाच्या मध्यातले मराठी जग मी आणि तिने कधी अनुभवले नव्हते, पण वाचताना आम्हाला त्याची कल्पना येईल इतके ते जवळ होते. मला आवडणाऱ्या आणि तिला मान्य असणाऱ्या अशा मराठी पुस्तकांचे विश्व आता जवळपास विलयाला गेले आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मराठीतल्या नवीन लेखकाचे पुस्तक क्वचित आणतो. लॉकडाऊनमध्ये दीपक घारे यांनी लिहिलेले लिओनार्दोचे चरित्र मी तिला दिले. ते मला आवडले होते. पण तिने ते फक्त पाहून ठेवून दिले. ते जग तिचे नव्हते. ती आता ऐंशीच्या घरात आहे. काळ आणि वेळेचा अध्येमध्ये गोंधळ होतो. डॉक्टर म्हणाले- वयपरत्वे मेंदूतल्या रक्तवाहिन्या आक्रसल्या आहेत. परवा पुस्तकांच्या कपाटात काही उलथापालथ करत होती. काय शोधते आहेस असे विचारले असता म्हणाली, ‘अरे, येथे भाव्यांचे गुलाबी कव्हरचे पुस्तक होते!’ ‘काय पाहिजे त्यातले?’ मी त्रासिक स्वरात विचारले. ‘त्यात फाळणीच्या दंगलीत सापडलेल्या एका स्त्रीची कथा होती.’ मला तर काही आठवत नव्हते. म्हटले जरा टोकून पहावे- “काय नाव होते पुस्तकाचे?” माझ्याकडे न पाहता ती म्हणाली, ‘रेशीमधागे!’ मी मुकाट्याने उठलो आणि पुस्तक शोधून दिले.

हे सगळे अनुभवताना वाटते की, या वाचनाचा परीघ वाढायला हवा होता. ‘स्मृतिचित्रे’मधून बालकवींच्या कवितेकडे किंवा ‘महाभारता’कडून ‘भगवदगीते’चा हात पकडून तत्त्वज्ञानाच्या प्रांतात शिरता आले असते. वाचनाचा प्रवास ‘माझे’ जीवन ते मानवी-जीवन असा होता होता राहिला. पु. भा. भावे तिचे आवडते कथाकार, पण त्यांना सोडून तिने इतर कथाकार वाचले नाहीत. तिने वाचायलाच फार उशिरा सुरुवात केली. भाषा बदलल्याचाही फरक पडला. तरुण असताना तिला कोणी वाचन समजावणारी व्यक्ती भेटायला हवी होती. तिने महाविद्यालयात न जाण्याचा आणि नंतर नोकरी न करण्याचा परिणाम साऱ्या कुटुंबावर झाला. तरीही तिला वाचताना पाहिल्यावर लक्षात येते की, असले अतिशय मर्यादित आणि चाकोरीतले वाचनदेखील व्यक्तीचे अंतस्थ जीवन कितीतरी समृद्ध करते. पुस्तकाचे पान हे रस्त्यावरच्या एखाद्या नाक्यासारखे असते. तिथली सारी पात्रे वाचकाच्या आगमनाची वाट पाहत असतात. फक्त वाचकाला काळ-वेळ ओलांडत तिथे आईसारखे जाता आले पाहिजे...

.............................................................................................................................................

लेखक रवींद्र कुलकर्णी युद्धविषयक पुस्तकांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.

kravindrar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......