‘इंडिका’ : भारताच्या भूगोलाची चित्तथरारक कहाणी!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अजिंक्य कुलकर्णी
  • ‘इंडिका’चे इंग्रजी व मराठी अनुवादाचे मुखपृष्ठ
  • Sat , 18 July 2020
  • ग्रंथनामा शिफारस इंडिका Indica प्रणय लाल Pranay Lal

भूगोलाच्या अभ्यासाची फार मोठी परंपरा आहे. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकांपासून भूगोलाच्या अभ्यासाला प्रारंभ झाल्याचे दाखले सापडतात. या अभ्यासाला गती प्राप्त झाली ती Cartography म्हणजे नकाशा तयार करण्याचे तंत्र शोधल्यानंतर. आधुनिक काळात उपग्रहतंत्रज्ञान (सॅटेलाईट टेक्नॉलॉजी), जीपीएसच्या या तंत्रज्ञानाचा शेती, पर्यावरण, भूविज्ञान, भौगोलिक इतिहासाच्या अभ्यासात मोठा वापर आहे. सध्या ‘भौगोलिक इतिहास’ हा शालेय अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षा यांपुरताच मर्यादित झाला आहे. क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर काही पुस्तके अशी असतात, जी भूगोल, मानवी उत्क्रांती, जीवसृष्टीचा नैसर्गिक इतिहास या विषयातसुद्धा रस निर्माण करतात. असंच एक प्रणय लाल लिखित, नंदा खरे अनुवादित आणि मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित पुस्तक म्हणजे - ‘इंडिका’ होय.

हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणांत विभागलेलं आहे. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन मानवाच्या उत्क्रांतीपर्यंतचा आढावा यात आहे. भौगोलिक इतिहासात एक कालमापनाची पायरी सर्वांत महत्त्वाची असते. त्यातले आकडे भयंकर मोठे असतात. त्याऐवजी या पुस्तकात नवीन युक्ती वापरलेली आहे. यात पृथ्वीच्या ४६० कोटी वर्षं वयासाठी ४६ वर्षीय स्त्रीचं रूपक योजल्यामुळे आकड्यांच्या जंजाळातून सुटका होते आणि समजायलाही सोपं जातं. पृथ्वी आणि चंद्राच्या आयुष्यातली सुरुवातीची दोन अब्ज वर्षं त्यावर सतत उल्काच आपटत होत्या. या उल्कापातामुळे पृथ्वीला हिरे, पाणी, सोने वगैरे अनेक खनिजं मिळाली. पुढे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी स्थिर झाली. वातावरणातील ऑक्सिजन वाढू लागला, सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे ऑक्सिजनचे रूपांतर ओझोनमध्ये होऊ लागले आणि ओझोनमुळे परत सूर्याची अतिनिल किरणे अडू लागली. पृथ्वीभोवती ओझोन वाढल्यामुळे पृथ्वी थंड पडायला सुरुवात होऊ लागली. ऑक्सिजन व कार्बन संयोग पावल्याने कार्बनडायऑक्साईड तयार होऊ लागला.

शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर सुरुवातीला बारा खनिजं होती. सूर्याभोवतीही हीच बारा खनिजं होती. सूर्याच्या उष्णतेनं पृथ्वीवर भूरासायनिक क्रिया सुरू होऊन इतर खनिजांची निर्मिती झाली. काळाच्या पटावर थेट पुढे एकपेशीय सजीवांच्या निर्मितीपर्यंत आलो तर असे लक्षात येते की, या एकपेशीय सजिवांच्या शरीररचना जास्त क्लिष्ट असतात. Mitochondria ज्याला ‘पॉवर हाऊस ऑफ सेल’ असं म्हटलं जातं, त्याची निर्मिती एकपेशीय सजीवात कशी झाली? पृथ्वीच्या आयुष्यात मग आल्या बुरश्या, परंतु त्यांनी अगदी थोडाच काळ वनस्पतींना मागे टाकलं होतं.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://bit.ly/3he3mvf

..................................................................................................................................................................

भारतीय उपखंडात एक पेशीय सजीव कसे तयार झाले? त्यांच्यापासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती कशी झाली? सागरात जशी प्राण्यांची निर्मिती झाली, तशी जमिनीवर वनस्पतींची निर्मिती कशा प्रकारे झाली? भारतीय उपखंडातील सजीव-निर्जीवात झालेल्या उत्क्रांतीचा अभ्यास आपल्याला ‘इंडिका’त वाचायला मिळतो.

काही अद्भुत गोष्टीही यात वाचायला मिळतात. उदा. कोणकोणत्या प्रकारचे मासे आपल्याकडे आढळत होते? कोणते मासे उत्क्रांतीत टिकले कोणते कायमस्वरूपी नष्ट झाले? तर काही माशांमध्ये शारीरिक बदल कसे झाले. या शारीरिक बदल होऊन टिकलेल्या छोट्या माशांपैकी Cypselurus प्रजातींचे मासे मोठ्या माशांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पाण्यापासून चक्क काही फूट उंच उडू शकतात. Lobe fish प्रकारातील मासे मात्र आज जवळपास नष्ट झाले आहेत.

भारतीय उपखंडातील जीवाष्म अभ्यास दाखवतो की, सूर्यस्नान करणाऱ्यांमध्ये हळूहळू मानेचे हाड व कवटी यांच्यातला सांधा बदलून तो लवचीक झाला आणि मान डावी-उजवीकडे वळवणे शक्य होऊ लागले. याचा फायदा होऊन पाण्यात वावरताना भक्ष्य पकडणे, अन्न चावणे, गिळणे या क्रिया सोप्या होऊ लागल्या. 

अकरावी-बारावीच्या जीवशास्त्रात फर्न (नेचे), सायकॅड या वनस्पतींचा समावेश आहे. मला व्यक्तीशः त्या वनस्पतींचा अभ्यास करायचा फार कंटाळा यायचा. प्रश्न पडायचा की, का करायचा या वनस्पतींचा अभ्यास? ‘इंडिका’ वाचल्यावर लक्षात समजतं की, पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान जेव्हा जेव्हा ८०-९०° सेल्सियसपर्यंत गेलं आहे, त्या त्या वेळी फर्न व सायकॅड यांचं बी मातीआड तग धरून राहिलेलं आहे. पृथ्वीवर वनं रुजवण्यात, या दोन वनस्पतींचा सिंहाचा वाटा आहे.

‘प्राणी मोठे आणि अजस्त्र’ आणि ‘भारत नावाचे बेट’ या दोन प्रकरणांत भारतीय उपखंड कोट्यवधी वर्षांपूर्वी कसं तयार झालं? भारतात कोणकोणत्या प्रकारच्या डायनासॉरचं वास्तव्य होतं? त्यांचे जीवाश्म कुठे कुठे सापडले आहेत? गोंडवाना प्रदेशा (मादगास्कर, ऑस्ट्रेलिया, भारत)पासून भारत वेगळा कसा झाला, भारताची निर्मिती कशी होत गेली? भारतीय उपखंडात हिमालय पर्वत कसा तयार झाला? याच्या चित्तथरारक गोष्टी वाचायला मिळतात. 

गोंडवाना प्रदेशापासून वेगळा होण्याचा वेग हा भारताचा इतरांच्या तुलनेत सर्वांत जास्त होता. सुरुवातीला हा वेगळं होण्याचा वेग साधारणपणे आठ सेंटीमीटर प्रति वर्ष इतका जास्त होता. इतरांच्या तुलनेत हा नक्कीच जास्त होता. नंतरच्या काळात अस्मानी संकटामुळे डायनासॉर नष्ट झाले, पण १६ कोटी वर्षं या डायनासॉरनी या पृथ्वीतलावर राज्य केलं.

भारतात सापडणाऱ्या डायनासॉरबद्दल वाचताना वाटतं की, इतका भोगोलिक वारसा आपल्याकडे असताना शालेय अभ्यासक्रमात सातासमुद्रापलीकडे असणारे टुंड्रा प्रदेशात तांदूळ पिकतो का गहू, हे का शिकवतात? त्याऐवजी हा खजिना का उघडून दाखवला जात नाही?

अंटार्टिकावर जेवढा जास्त बर्फ जमा होईल तेवढा भारतात पाऊस कमी पडतो. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अंटार्टिकावर जितका कमी बर्फ जमा होईल, तेवढ्या जास्त क्षेत्रावरच्या पाण्याची वाफ होते. परिणामी भारतात मान्सून जास्त सुधारतो.

भारतातील नद्यांचा उगम कुठे कसा झाला, त्यात कोणकोणते बदल झाले, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगा, नेवाशाला सापडलेली पुरातन हत्यारे याचा इतिहास वाचताना नकळत मराठी म्हणून आपला अहम सुखावतो.

या पुस्तकात तांत्रिक माहिती व शास्त्रीय शब्दांची रेलचेल आहे. जर ही माहिती नकोशी वाटली तर आपण काही पाने ओलांडून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे वाचनात कोणताही रसभंग होत नाही.

या अनुवादित पुस्तकात मुद्रितशोधनाच्या बऱ्याच चुका झालेल्या आहेत. ‘डीएनए’ हा शब्द ‘डिएने’ असा, तर ‘चेन्नई’ हा शब्द ‘चन्नै’ असा छापला गेला आहे. नकाशांखाली भारताचा उल्लेख ‘पिवळी चांदणी’ असा केला आहे आणि नकाशात प्रत्यक्षात ती दिसत नाही. त्यामुळे नकाशा वाचनात थोडी अडचण येते.

या चुका सोडल्यास पुस्तक माहितीपुर्ण आणि वाचनीय नक्कीच आहे.

..................................................................................................................................................................

‘इंडिका’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5153/Indica

.............................................................................................................................................

अजिंक्य कुलकर्णी

ajjukul007@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......

‘धर्म, राजकारण आणि अन्य प्रश्नांचा धांडोळा’ : आसपासच्या उलथापालथीने अस्वस्थ होणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या आस्थेच्या प्रश्नांची चर्चा करणारे हे पुस्तक आहे...

गेल्या दहा वर्षांत याबाबत विरोधाभासाचे राजकारण होतेय, ते प्रतिमांच्या व्यक्तिकेंद्रित आभासात जनमानसाच्या लक्षातच येत नाही, ही चिंतेची बाब आहे. पोकळ घोषणांच्या झुल्यावर झळकणारे समाजमन भव्य दिव्य सूचित करण्याचा आभासीकेत अडकले आहे. बधीर झाले आहे. धार्मिक उन्मादात सामाजिक ताणतणाव वाढत आहेत. धार्मिक प्रदूषणाला नैतिकतेच्या आवरणाखाली धर्मभोळेपणाचा राजकीय मुलामा देऊन वाटचाल सुरू आहे.......