‘देहाचिये गुंती’ : ‘कामप्रेरणे’कडे बघण्याची नवी दृष्टी देणारी आध्यात्मिक बाबाच्या जीवनावरील कादंबरी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शौकत आतार
  • ‘देहाचिये गुंती’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 10 July 2020
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस अंजली सोमण Anjali Soman देहाचिये गुंती Dehachiye Gunti

माणसाच्या भूक आणि काम या आदिम व स्वाभाविक प्रेरणा. समाजातील प्रत्येक व्यक्तीवर संस्कार, परंपरा, आसपासचं वातावरण, जीवनानुभव, वाचन, मनन अशा अनेक गोष्टी प्रभाव टाकतात आणि त्या अनुषंगानं त्याचं व्यक्तिमत्त्व घडत जातं. त्याचबरोबर माणसाला दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं. मग ते कौटुंबिक, सामाजिक, लैंगिक अशा कुठल्याही प्रकारचे असू शकतात. त्यामुळे माणूस त्रस्त होऊन सुखाला पारका होतो. तो आपल्या समस्यांना मनामध्ये घेऊन अस्वस्थतेत जगतो. त्या वेळी कुठल्यातरी माध्यमातून तो गुरू-बाबांच्या संपर्कात येतो, त्यांच्याकडे आकर्षिला जातो.

..आणि मग त्याला आपल्या समस्येची सोडवणूक होणार, आपल्या जीवनातील दु:ख कमी होणार, आपण सुखी होणार अशी आशा निर्माण होते. तो एका विशिष्ट निष्ठेतून, श्रद्धापूर्वक अशा गुरूंचं ऐकत राहतो, त्यांचा अनुयायी बनून राहतो, त्यांच्यासाठी आपल्या आयुष्यातील काही वर्षे खर्ची घालतो. पण कालांतरानं गुरूच्या ‘कथनी और करनी’मधलं अंतर, त्यांच्या आश्रमातील पडद्यामागचं वास्तव, सहकाऱ्यांचे खून, कोकेनच्या ओव्हरडोसने झालेला गुरुजींचा मृत्यू इ. गोष्टी त्याच्या लक्षात येतात. तो ‘आपल्याला काय मिळाले?’ याची शहानिशा करतो. गुरूच्या व्यक्तिमत्त्वाचा तटस्थपणे आलेख मांडतो.

‘देहाचिये गुंती’ ही डॉ.अंजली सोमण यांची कादंबरी साधारणत: असा आशय मांडते.

या कादंबरीचा नायक परम हा मानवी मनाचं प्रगाढ ज्ञान, विलक्षण बुद्धिमत्ता, वाचन व चिंतनाच्या जोरावर आपल्या वाणीनं सगळ्यांना प्रभावित करण्याची क्षमता असलेला एक सर्वगुणसंपन्न तरुण. त्याचा प्राध्यापक ते आध्यात्मिक गुरूपर्यंतचा प्रवास या कादंबरीत रेखाटला आहे. तो स्वत: काही बोलत नाही; विद्या, प्रेमा, योगेश व क्रांती या चार पात्रांच्या माध्यमातून त्याची व्यक्तिरेखा स्पष्ट होत जाते.

त्यातील पहिली विद्या, ती परमच्या व्यक्तिमत्त्वानं प्रभावित होते. विशेषत: त्याच्या वाणीनं. त्यालाही विद्या आवडते. जेव्हा ती त्याला ‘तुला माझ्यातलं काय आवडलं?’ असे विचारते, तेव्हा तो म्हणतो, “विद्या, मानवी वर्तनाचं विश्लेषण करणं फार अवघड असतं. तू तेच करायला मला सांगते आहेस. एखादी भावना मनात जागी होते. ती का जागी झाली, हे सांगणं फार अवघड असतं. काही कारणं भूतकाळात रुजलेली असतात, काही वर्तमानात.” या आणि अशा अनेक वाक्यांवर, त्याच्या बोलण्यावर विद्या खूप प्रभावित होते आणि ते दोघं लग्न करतात. पण काही कालावधीनंतर परम तिला व छोट्या मुलाला सोडून निघून जातो.

नंतर त्याच्या आयुष्यात प्रेमा नावाची व्यक्ती येते, जी या कादंबरीतील दुसरं महत्त्वाचं पात्र. ती आपल्या वासनांध नवऱ्याला, सासरच्या संवेदनाहीन माणसांना, त्यांच्या बुरसटलेल्या परंपरांना कंटाळलेली असते. ती परमच्या संपर्कात येते. त्याचं शिबिरातील प्रवचन तिच्या कानी पडतं. तो सांगत असतो- “तुमचा आनंद तुमच्याच हातात असतो. पण तुम्हाला तो मिळत नाही. कारण तो तुमच्या अंतर्मनात असतो. माणूस कधीच अंतर्मुख होऊन स्वत:च्या सुखाचा शोध घेत नाही. स्वत:ला काय पाहिजे आहे, याचा विचार करत नाही. माणूस नावाचा प्राणी बहिर्मुखच. नेहमी इतरांविषयी बोलत असतो. इतरांच्या सुख-दु:खातच उड्या घेत असतो. स्वत:च्या सुखाचा कधी असा कसून शोध घेतो का? घेतला तरी चुकीच्या मार्गानं सुख शोधतो. त्याला वाटतं, सुख म्हणजे पैसा, सुख म्हणजे बंगला, गाडी. सुख म्हणजे रेडिओ ऐकणं, सिनेमा बघणं, परीक्षा देणं, त्यात चांगले मार्क्स मिळवणं. पण यानं खरं सुख लाभतं का? अजिबात नाही. हे खरं सुख नाहीच. हे रस्ते म्हणजे दु:खांवर झाकण टाकण्याचा प्रयत्न. यांनी दु:ख नाहीसं होत नाही. काही काळ नजरेआड होतं इतकच. वर घातलेल्या झाकणाला जरा फट पडली की, आतलं भळभळतं दु:ख उसळी घेऊन बाहेर येतंच.”

प्रेमा परमच्या प्रवचनाने प्रभावित होते. आपल्या नवऱ्याला व मुलाला सोडून परमसोबत पळून जाते. पुढे त्याचा आश्रम उभा करण्याची संपूर्ण जबाबदारी घेते. परमचा पुढे ‘परमानंद गुरुजी’ होतो. पण कालांतरानं परम सुनंदाला जवळ करतो. प्रेमाला दुय्यम स्थान देतो. तिला एकाकी पाडतो. शेवटी प्रेमा त्याला सोडून निघून जाते.

तिसरं पात्र योगेश, तो आपल्या डॉक्टर वडिलांच्या सतत धाकानं आत्मविश्वास हरवून बसलेला असतो. अशा परिस्थितीत तो परमानंदच्या संपर्कात येतो, त्याच्या शिबिरात सहभागी होतो. परमानंद गुरुजी म्हणत असतात, “सत्य आणि आभास यांच्यातील गोंधळ म्हणजे जीवन. या गोंधळात आपण अडकून पडलेलो असतो. मनात संभ्रम असतात. चूक काय आणि बरोबर काय याचा निर्णय घेता येत नसतो. असं फरफटत जाणं आणि पैसे मिळवण्यासाठी करावी लागणारी नित्यकर्म करणं म्हणजे आयुष्य…”

त्या प्रवचनाने योगेशच्या जीवनाला दिशा मिळते. पण आश्रमातील वास्तव गोष्टी योगेशला कळतात. तो भूतकाळात जाऊन त्यांचं विश्लेषण करत राहतो.

कादंबरीतील चौथं पात्र क्रांती, ती लहानपणी मामाच्या वासनेला बळी पडलेली असते... पुढे प्रियकर जितूच्या आत्महत्येमुळे डिप्रेशनमध्ये गेलेली असते. त्यामुळे निम्फोमॅनिअॅक, हायपर सेक्शूअल झालेली असते. ती परमानंद गुरुजींच्या संपर्कात येते. ते सांगत असतात, “तुमचं मन म्हणजे उत्साहानं उसळणारं एक कारंजं आहे. खरं नाही ना वाटत तुम्हाला हे? पण ते सत्य आहे. लहान मुलाकडे कधी बघितलंय तुम्ही? किती उत्साहात असतात. सतत खिदळत असतात. चेहऱ्यावर निरागस हास्य असतं. तुमचं मन या लहान मुलासारखंच होतं. पण ते काळवंडलं. का? तर तुमच्यासमोर प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांचं तुम्ही कोळ्यासारखं सुंदर जाळं निर्माण केलंत आणि त्यात स्वत:च अडकलात.”

ती योगेशसोबत लग्न करते व चार वर्षांत घटस्फोटही घेते.

या चार व्यक्तीरेखांच्या कथनातून परमचा प्राध्यापक ते आध्यात्मिक गुरूपर्यंतचा प्रवास स्पष्ट होत जातो. या चारही पात्रांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. ती वेगवेगळ्या कुटंबांतील, वेगवेगळ्या सामाजिक-मानसिक परिस्थितीत वाढलेली आणि वेगवेगळ्या समस्या असलेली आहेत.

अलीकडच्या काळात आध्यात्मिक बुवा-बाबांचं प्रस्थ वाढलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी महत्त्वाची ठरते. अध्यात्माच्या नावाखाली गुरू-बाबांचं वाढतं प्रस्थ आणि लोकांची एका अर्थानं फसवणूक, हे समाज-वास्तव ही कादंबरी अधोरेखित करते.

प्रारंभीच ‘गुरुजींची हत्या का झाली?’ ही गोष्ट कादंबरीमध्ये कुतूहल वाढवते. कम्यून, तिथली शिस्त, तिथले लहानसहान संदर्भ, बारकाईनं केलेलं मनोविश्लेषण यामुळे कादंबरी गुंतवून ठेवते.

या कादंबरीत मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र यातील खूप सारे संदर्भ आले आहेत. लेखिकेचा जीवनानुभव, वाचन, चिंतन, मननाचा परिचय देणारी ही कादंबरी एका ज्वलंत विषयाचं भान आणून देण्याचं काम करते.

कादंबरी फ्लॅशबॅक पद्धतीनं उलगडत जाते. प्रत्येक पात्राला सुरुवातीला परमच्या मृत्यूची बातमी कळते आणि मग ते पात्र भूतकाळातली परमबरोबरची आपली कथा सांगतं… त्यातून परमची व्यक्तिरेखा उलगडत जाते.

या कादंबरीमध्ये फ्राईडने सांगितलेल्या कामप्रेरणेचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अत्यंत कलात्मकतेनं वास्तवादी पात्रांच्या माध्यमातून अभिव्यक्त झाला आहे. पात्रं आपल्या जीवनाविषयी, लैंगिकतेविषयी बोलतात.

आध्यात्मिक चिंतन, जीवनविषयक अनुभव, अनेक पुस्तकांचे संदर्भ, नातेसंबंधांचं मार्मिक विश्लेषण, पात्रांचं मनोविश्लेषण, पात्रानुकूल भाषा, शब्दनिवड, मानसशास्त्रीय संकल्पना असा विस्तृत पट असलेली ही कादंबरी प्रभावित तर करतेच, पण ‘कामप्रेरणे’कडेही बघण्याची नवी दृष्टी देते.

..................................................................................................................................................................

देहाचिये गुंती : डॉ. अंजली सोमण

कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

पाने : ४३६, मूल्य : ४०० रुपये.

..................................................................................................................................................................

‘देहाचिये गुंती’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5208/Dehachiye-Gunti

..................................................................................................................................................................

लेखक प्रा.शौकत आतार हे नागठाणे येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात अध्यापन करतात.

shaukatatar@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......

‘धर्म, राजकारण आणि अन्य प्रश्नांचा धांडोळा’ : आसपासच्या उलथापालथीने अस्वस्थ होणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या आस्थेच्या प्रश्नांची चर्चा करणारे हे पुस्तक आहे...

गेल्या दहा वर्षांत याबाबत विरोधाभासाचे राजकारण होतेय, ते प्रतिमांच्या व्यक्तिकेंद्रित आभासात जनमानसाच्या लक्षातच येत नाही, ही चिंतेची बाब आहे. पोकळ घोषणांच्या झुल्यावर झळकणारे समाजमन भव्य दिव्य सूचित करण्याचा आभासीकेत अडकले आहे. बधीर झाले आहे. धार्मिक उन्मादात सामाजिक ताणतणाव वाढत आहेत. धार्मिक प्रदूषणाला नैतिकतेच्या आवरणाखाली धर्मभोळेपणाचा राजकीय मुलामा देऊन वाटचाल सुरू आहे.......