जल्लिकट्टूला घेतलं ‘पेटा’ने शिंगावर, तामिळी जनता उतरली रस्त्यावर!
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • ‘जल्लिकट्टू’चे एक प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 21 January 2017
  • पडघम देशकारण jallikattu जल्लिकट्टू Tamil Nadu तामिळनाडू Pongal पोंगल बुल फायटिंग Bullfighting

गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमधील जनता रस्त्यावर उतरली आहे. जल्लिकट्टू या खेळाच्या बंदीविरोधात केवळ सर्वसामान्यच नाहीतर रजनीकांत, ए.आर. रहमान यांच्यासारखे चित्रपटकलावंतही मैदानात उतरले आहेत. जल्लिकट्टू हा तामिळनाडूमधील राज्य खेळाचा दर्जा असलेला प्राचीन खेळ आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणल्यापासून तो पुन्हा सुरू करण्यासाठी सातत्याने मागणी केली जात आहे. शेवटी काल केंद्र सरकारने तामिळनाडू सरकारला या खेळाबाबत अध्यादेश काढण्याची परवानगी दिली. त्यानुसार आज तामिळनाडूचे राज्यपाल तसा अध्यादेश काढून या खेळाला परवानगी देतील.

आंदोलनकर्त्यांनी या खेळाच्या विरोधात जनहितयाचिका दाखल करणाऱ्या पेटा (People for the Ethical Treatment of Animals) या संस्थेवरच बंदी आणण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे पेटाने राज्यापालांच्या अध्यादेशालाही न्यायालयात आव्हान दिलं जाईल असं जाहीर केलं आहे.

पेटाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहितयाचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने २०१४मध्ये या खेळावर बंदी घातली होती. त्यानंतर तामिळनाडू सरकारने पुनरावलोकन याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती स्वीकारली नाही. गतवर्षी केंद्र सरकारने अध्यादेश काढून या खेळाला परवानगी दिली होती, पण न्यायालयाने त्यावरही स्टे आणला होता. आता सर्वोच्च न्यायालयात या खटल्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यावर न्यायालय लवकरच निर्णय देईल.

तो येईल तेव्हा येईल. तो काय असेल हे आत्ताच सांगता येणार नाही, पण बंदीचा असेल तर पुन्हा तामिळी जनतेमध्ये क्षोभ भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो.

तूर्त या खेळाविषयी थोडक्यात जाणून घेऊ…

‘जल्ली’ हा शब्द सल्ली या शब्दापासून आल्याचे मानले जाते. त्याचा अर्थ होतो, सिक्के. तर ‘कट्टू’ या शब्दाचा अर्थ होतो, बांधलेला.

पोंगलच्या दिवसांत तामिळनाडूमधील प्रत्येक शहर आणि गावामध्ये हा खेळ खेळला जातो. या खेळाला तामिळी आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग मानतात.

हा खेळ चारशे वर्षं जुना असल्याचं सांगितलं जातं. काही लोक हा खेळ २००० वर्षं जुना असल्याचाही दावा करतात. प्राचीन काळी नवऱ्या मुली वराची निवड करण्यासाठी या खेळाचा आधार घेत असंही सांगितलं जातं. त्यामुळे या खेळाचं आयोजन स्वयंवरासारखं केलं जात असे.

हा खेळ पीक काढणी झाल्यानंतर पोंगलच्या काळात आयोजित केला जातो. धष्टपुष्ट वळूच्या शिंगांना लाल कापड बांधलं जातं आणि त्याला भडकावून गर्दीत सोडलं जातं. तरुणांनी त्याची शिंगं पकडून त्याला ताळ्यावर आणून त्याच्या शिंगाला बांधलेलं कापड सोडवायचं असतं. जो तरुण ते सोडवतो त्याला बक्षिस दिलं जातं.

वळूंना भडकावण्यासाठी त्यांना दारू पाजली जाते किंवा त्याच्या डोळ्यात तिखट टाकलं जातं किंवा त्याची शेपटी पिरगाळली जाते. आणि यामुळेच पेटाच्या कार्यकर्त्यांचा या खेळावर आक्षेप आहे.

या खेळाआधी तामिळी लोक आपापल्या गावात आपल्या वळूंना घेऊन या खेळाचा सराव करतात. मातीच्या ढिगाऱ्यावर शिंगे रगडायला लावून वळूकडून खेळाचा सराव करून घेतला जातो. त्याला बळकट खुंट्याला बांधून उचकवले जाते. त्यामुळे तो भडकून आपल्या शिंगांनी समोरच्याला अंगावर घेण्याच्या प्रयत्न करतो.

खेळाच्या सुरुवातीला एकेक करून तीन वळूंना मैदानात सोडलं जातं. ते गावातले सर्वांत वृद्ध वळू असतात. त्यांना कुणीही पकडत नाही. ते गावाची शान असतात. त्यानंतर खेळ सुरू होतो. हा खेळ तीन दिवस चालतो.

काही लोक या खेळाची तुलना स्पेनमधील बुल फायटिंगशी करतात. पण जल्लिकट्टू बुल फायटिंगपेक्षा पूर्णपणे वेगळा खेळ आहे. यात वळूनला मारलं जात नाही किंवा वळूला ताळ्यावर आणण्यासाठी कुठल्याही शस्त्राचा आधार घेतला जात नाही.

जल्लिकट्टू या खेळामध्ये वळूला वंदनीय मानलं जातं, कारण तो शेतीचा आधार असतो. बुल फायटिंगचं तसं नाही. ते वळू शेतीच्या कामासाठी वापरले जात नाहीत, ते फक्त या खेळासाठीच तयार केले जातात.

या खेळासाठी जेलिकट या जातीचेच वळू वापरले जातात. हे वळू स्वभावत:च आक्रमक असतात. ते आपल्या शिंगांनी मारतात.

या खेळात वळूंना ताळ्यावर आणण्यात अनेक तरुण जखमी होतात. काहींच्या जिवावरही बेततं. २०१० ते २०१४ या चार वर्षांत तामिळनाडूमध्ये या खेळात साधारणपणे अकराशेहून अधिक तरुण जखमी झाले होते, तर १७ जणांचा मृत्यू झाला होता.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......