टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मोदी आणि त्यांची आई, मायावती आणि आनंदकुमार, कॅशलेस विवाह, मोदी, मुलायमसिंग यादव
  • Wed , 11 January 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi मायावती Mayawati आनंदकुमार Anand Kumar मुलायमसिंग यादव Mulayam Singh Yadav

१. आता सर्व काही अखिलेशकडे आहे, माझ्याकडे फक्त मोजण्यापुरतेच आमदार आहेत. : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची खंत.

नेताजी, ही खंत आहे की टाकला डाव सफल झाल्याचा आनंद? तुम्ही अशी विधानं केलीत, तर आता जे बोटावर मोजण्याइतके सोबत आहेत, तेही इथे काही खरं नाही म्हणून तिथेच जातील ना? की तीच नेपथ्यरचना आहे?

…………………………………….

२. ज्याची लायकी असेल त्याला निवडणुकीसाठी उमेदवारीचं तिकीट मिळेल. त्यामुळे आपल्या परिवारातील लोकांना तिकीट मिळावे यासाठी दबाव टाकू नये. : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वपक्षीयांना इशारा

कसली पात्रता? निवडणूक जिंकण्याचीच ना? ती ठरवणार कोण? अमित शाहच ना? मग ठीक आहे. तुमच्याकडेही कुटुंबाकुटुंबांनी ती पात्रता कमावलेली आहेच. त्यामुळे हा इशारा सतरंजी उचलणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच उद्देशून आहे बहुतेक. कारण, निवडून येण्याची क्षमता अर्थात इलेक्टोरल 'मेरिट' असलेल्या बाहेरच्या पक्षाच्या आयात उमेदवारांना हा निकष लावला जाताना दिसत नाही.

…………………………………….

३. नियमित योगासने करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी या नियमाला छेद देऊन गुजरातेत आपल्या आई हिराबा यांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर नाश्ताही केला. खुद्द पंतप्रधानांनीच याची ट्विट करून माहिती दिली. 

म्हाताऱ्या-कोताऱ्यांना लायनीत उभे करण्याचा उद्योग थांबल्याशिवाय घरात पाऊल टाकायचं नाही, असा आईने दम दिला होता की काय? ती माऊली बिचारी आताही धास्तावली असेल, आता लेकासाठी फोटो काढून घ्यायला कुठे जावं लागतंय याचा नेम नाही म्हणून.

…………………………………….

४. मायावती यांचे बंधू आनंद कुमार यांची संपत्ती सात वर्षांत सात कोटींवरून थेट १,३०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

ती मुळात शून्यातून सात कोटींवर किती वर्षांत पोहोचली, याचीही माहिती खरंतर मिळायला हवी. बहीण सत्तेबाहेर असताना एवढी प्रगती होत असेल, तर सत्तेत असतानाचा उत्कर्ष किती असेल? व्यवसायात यशस्वी होण्याचं तंत्र या विषयावर खरंतर राजकारणी उद्योजकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी पुस्तकं लिहायला हवीत. लोक उगाच कष्ट आणि व्यावसायिक कौशल्यांच्या मार्गाने यशस्वी होण्याचा प्रयत्न करत बसतात.

…………………………………….

५. पश्चिम बंगालच्या सिंगभूम जिल्ह्यातील बादीया गावात एकाच वेळी दोन सामाजिक हेतू साध्य करणारा अनोखा विवाह पार पडला. लग्नाच्या काही तास आधी वधु-वर पक्षांनी एकत्र येऊन नवरदेवाच्या घरात शौचालय बांधलं आणि एका पैशाचाही रोखीने व्यवहार न करता कॅशलेस विवाहसोहळा पार पाडला.

यांच्यात ते मेहुणीने जोडे लपवणं, मुँहदिखाई वगैरे नसतं का? तेही पेटीएमनेच केलं असेल. आता नवरदेव हनीमून संपवून गृहस्थाश्रमात प्रवेश करतील, तेव्हा कोथिंबीर, मिरच्याही कॅशलेस खरेदी करतील, यात शंका नाही. हे लग्न होतं की सरकारी जाहिरातपटाचं शूटिंग?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......