लेखक लिहीत राहतो. म्हणजे लिहिण्याचा व्यायाम. सृजनाचा व्यायाम
ग्रंथनामा - आगामी
डॉ. सुधीर रा. देवरे
  • ‘टिंबं’
  • Sat , 30 November 2019
  • ग्रंथनामा Granthnama आगामी टिंबं सुधीर देवरे

डॉ. सुधीर रा. देवरे यांची ‘टिंबं’ ही नवी कादंबरी लवकरच गोव्याच्या ‘सहित’ प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या कादंबरीचा काही अंश...

.............................................................................................................................................

सिनियर लेखकाशी ज्युनियरचं प्रत्यक्ष वा फोनवर बोलणं होत राहतं. प्रत्येक वेळी जशी मागची उजळणी होते तसे बोलण्यात नवे मुद्देही येत राहतात.

परवा सिनियर बोलता बोलता ज्युनियरला म्हणाले, ‘व्यायाम करतोस ना रोज?’

‘होय करतोय ना. जोरात चालण्याचा व्यायाम करतो. सूर्य नमस्कार नाही करत आता. झेपत नाही. शीर्षासन करायचो पण आता वय आणि वजन वाढल्यामुळे तेही नाही करत.’ असं म्हणून ज्युनियरने सिनियरला बोलायला स्पेस दिली.

स्पेस मिळताच सिनियर बोलू लागले, ‘बरोबर,  आता या वयात नाही करू शीर्षासन. मानेला त्रास होतो. एक कल्पना डोक्यात येऊन गेली परवा : जे अवयव हलवता येत नाहीत त्यांचा व्यायाम कसा करायचा. उदाहरणार्थ, काही अवयव सांगतो तुला. मुत्रपिंडाचा व्यायाम करता येईल का? कसा करायचा? माणसाला कान हलवता येत नाहीत. छोटे असतात ना म्हणून. बाकी प्राणी त्यांचे कान फडफडवतात. म्हणजे व्यायामच करतात ना कानांचा. माणसाला कानांचा व्यायाम कसा करतात, हे शोधून काढावं लागेल. कपाळाचा व्यायाम कोणालाच करता येत नाही. प्राण्यांनाही नाही. नाकाचा व्यायाम कसा करायचा. हृदय-काळीज, यकृत यांचा व्यायाम कसा करायचा? ज्या अर्थी आपण डोळ्यांचा व्यायाम करतो त्या अर्थी कपाळ, हृदय, यकृत, कान, नाक यांचा व्यायाम का करू नये? एका लेखकाने ‘यकृत’, ‘हृदय’ नावाची नाटके लिहिलीत हे माहिती आहे ना तुला?’

‘हो. श्याम मनोहर’ ज्युनियर म्हणाला.

‘बरोबर’

‘आतड्यांचा व्यायाम आपोआप होत असावा. जिभेचा व्यायाम आपोआप होतोय. दातांचा व्यायाम आपोआप होतो. नाकाचा आणि कानांचा आपोआप होतो की नाही मला माहीत नाही.’

‘कठीण आहे सगळं. खूप सुचतंय सर तुम्हाला’

‘हो, आणि हे कुठं द्यायचा प्रयत्न करू नकोस तू. फेसबुक, व्हॉटसअॅपबिटसअॅपवर देऊ नकोस. माझ्या नावासहीत द्यायचं झालं तरी देऊ नकोस. अशीच एकाशी फोनवर चर्चा केली आणि त्याने फेसबुकवर पोस्ट करून दिली. माझ्या नावानिशी. दिली तर दिली पोस्ट. माझी काही वाक्यं त्याच्या नावावर खपवून टाकली त्याने.’ सिनियर श्वास घेण्यासाठी थांबले. म्हणून ज्युनियर म्हणाला,

‘तुम्ही जे काही बोलतात ना वाचकांशी ते तुमच्या कादंबरीत येत असतं पुढं-मागं, हे मला माहीत आहे. म्हणून मी ते इतरत्र कुठं देत नाही आणि खाजगीतही सांगत नाही मित्रांना.’

‘हो मला माहीत आहे ते. विश्वास आहे तुझ्यावर. तू नाही देणार हे कुठं. हं, तर आपण काय बोलत होतो. व्यायामाविषयी. व्यायाम हा सर्वव्यापी आहे. शरीराच्या आतल्या आणि बाहेरच्या अवयवांच्या व्यायामाविषयी आपण बोलत होतो ना?’

‘हो सर’

सिनियर तंद्री लावत म्हणाले, ‘मेंदू आणि प्रतिभा हे काय आहे? मेंदू नावाचा आपल्या डोक्यात एक अवयव आहेच. पण प्रतिभा कुठं आहे? प्रतिभा हा अवयव नाही. मग लेखकात ती येते कुठून? मेंदूचा व्यायाम शक्य आहे. अनेक नवनवीन शोध हे मेंदूच्या व्यायामामुळेच शक्य झालेत असं म्हणता येईल. आणि कलांचा उद्‍गम हा प्रतिभेमुळे झाला. पण प्रतिभा कुठं आहे?’

सिनियर बोलायचे थांबले म्हणून ज्युनियर म्हणाला, ‘खूप गहन होत चाललंय सर.’

सिनियर सावकाश चिंतनात हरवून बोलू लागले, ‘हो. गहन आहेच रे हे सगळं. खूप खोल जावं लागतं. प्रतिभा हृदयात असते असं म्हणतात. आपणही गृहीत धरू तसं. गायक गाण्याचा रियाझ करतो. म्हणजे गाण्याचा व्यायामच ना. चित्रकार चित्रं काढण्याची सवय ठेवतो. म्हणजे चित्र काढण्याचा व्यायाम. लेखक लिहीत राहतो. म्हणजे लिहिण्याचा व्यायाम. आपण लेखक आहोत म्हणून लेखकावर फोकस करू. लेखक इतके श्रम करून लिहितो, त्या लिखाणाचं नेमकं काय होतं? कुठंतरी छापून येतं. नंतर त्याचं पुस्तक होतं. पण ते पुस्तक सर्वदूर पोचावं यासाठी आपण, प्रकाशक वा साहित्य रसिक काही खास प्रयत्न करतो का? लेखक जे लिहितो ते मर्यादित रसिकापर्यंतच पोचतं. आपल्या भाषेच्या लोकांपर्यंत पुस्तक सर्वदूर जाऊन धडकत नाही. एखाद्या घरी पोचतं, पण त्या घरातले सगळे लोक तरी ते पुस्तक वाचतात का? एखाद्या ग्रंथालयात पोचतं आणि तिथंच पडून राहतं ना नुसतं? सर्क्युलेट होत नाही. तुझं मी वाचायचं आणि माझं तू. हे साटंलोटंच झालं ना कॉलेजात एकमेकांना भाषणाला बोलवल्यासारखं.’

सिनियरला रिलिफ मिळावा म्हणून ज्युनियर मध्येच म्हणाला, ‘साहित्य वाचन चळवळ जोरात राबवायला हवी. मागे मी सांस्कृतिक दुष्काळाची डायरी लिहिली होती पहा. यावर भर द्यायला हवा.’

धागा पकडत सिनियर पुढे म्हणाले, ‘तसंच असं नाही, तेही बरोबर आहेच  परंतु जे लिहिलं जातं.. लिहून झालं आहे… छापून झालं आहे.. वितरीत झालं आहे... त्याची लागण का होत नाही दूर दूर पर्यंत? ते वादळासारखं पसरलं पाहिजे वेगानं, इतकं की एकानं वाचलं की त्याने दहा जणांना सांगून त्या दहा जणांनी झपाटून वाचलं पाहिजे. आणि त्यापुढे प्रत्येकाचे पुन्हा दहा दहा. दहाच का? दहाचे शंभर, शंभराचे हजार अशा रीतीने ...पुस्तकाची लागण झाली पाहिजे साथीच्या आजारासारखी. वाईट गोष्टी कशा स्प्रेड होतात सोशल नेटवर्कवरून तसं पुस्तकांचं झालं पाहिजे...’

सिनियर श्वासासाठी थांबताच ज्युनियर म्हणाला,

“तसं होतंही. पण ते लोकप्रिय साहित्याबद्दल होतं. अभिजात साहित्याबद्दल असं होत नाही. बाबा कदम जितके वाचले जातील तितके श्याम मनोहर वाचले जात नाहीत. गुलशन नंदा जितके वाचले जातात, तितके भालचंद्र नेमाडे वाचले जात नाहीत. दुसरा मुद्दा आजचे अनेक चांगले लेखक वाचकांना माहीत नाहीत. अजूनही अनेक वाचक ‘ययाती’, ‘मृत्यूंजय’, ‘स्वामी’ या पुस्तकांनाच मानदंड मानतात. काही लोक तर न वाचताच ही पुस्तकं वाचल्याची नावं सांगत राहतात.’

सिनियर नाहीतली मान हलवत म्हणाले, ‘तुझा हा मुद्दा मला तितकासा पटला नाही. कारण की, ‘ज्ञानेश्वरी’ कशी वाचली जाते अजूनही घराघरात? ‘तुकारामांची गाथा’ वाचली जाते ना अजून घराघरात? यावरही बोललं पाहिजे.’

ज्युनियरचे उत्तर तयार होते, ‘हो, सांगतो ना. ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा घराघरात आजही वाचली जाते. पण त्याच्यातले काव्य वा तत्त्वज्ञान भिडतं म्हणून ती वाचली जात नाहीत. म्हणजे तत्त्वज्ञान वा काव्यानंदासाठी ती वाचली जात नाहीत. धार्मिक ग्रंथ म्हणून केवळ श्रद्धेने ती वाचली जातात हे खरं कारण. जर या ग्रंथांत अध्यात्म नसतं वा त्यांचे कर्ते संत नसते तर हे साहित्यही दुर्लक्षित झालं असतं इतर अभिजात साहित्याप्रमाणे.’

सिनियर कबूल करत म्हणाले, ‘तुझ्या म्हणण्यात तथ्य आहेच. नाही असं नाही. पण मला दुसरी शंका येते’

‘कोणती?’

‘अजून तशी लिखित कलाकृतीच निर्माण झाली नसेल कदाचित? आपल्या प्रतिभेची निर्मितीच कमी पडते की काय. लेखकाला लिहायच्या मर्यादा पडत असाव्यात? सृजनाचाही व्यायाम असायला हवा, तो कमी पडतो की काय, अशी शंका आहेच.’ प्रश्न उपस्थित करून सिनियर थांबले. 

विचारांची लिंक लावत ज्युनियर म्हणाला, ‘सृजनाचा व्यायाम असतोच. पण हे सुद्धा पूर्ण सत्य नाही. विलास सारंग, जी. ए. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे... ह्यांची निर्मिती कमी पडते असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. त्यांना मर्यादा आहेत असंही नाही. इतकं अभिजात लेखन येऊनही अनेक वाचकांना ते ऐकूनही माहीत नसेल तर आपण उपस्थित केलेला मुद्दा बरोबर नाही असं मला वाटतं, तेव्हा…’ ज्युनियरने आपले म्हणणे अर्ध्यावर सोडून दिलं. यावर सिनियर काही बोलत नाहीत म्हणून ज्युनियर मनात म्हणाला,

‘वाचन ही जीवनावश्यक गरज नाही असं म्हणता येईल...’

.............................................................................................................................................

लेखक डॉ. सुधीर रा. देवरे भाषा, कला, लोकवाड्‍मय, लोकसंस्कृती आणि लोकजीवनाचे संशोधक आहेत.

sudhirdeore29@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......