पर्जन्याआधीची पिडा
पडघम - राज्यकारण
आसाराम लोमटे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 01 July 2019
  • पडघम राज्यकारण दुष्काळ महाराष्ट्र आसाराम लोमटे साधना साप्ताहिक

मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झाले आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदीआनंद आहे. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि सोशल मीडियावर पावसाच्या कविता, आठवणी यांची नेहमीप्रमाणे उधळण सुरू आहे. मात्र महिनाभरापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक भागात भीषण म्हणावा असा दुष्काळ होता. कथाकार, पत्रकार आसाराम लोमटे यांनी या दुष्काळाचा प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. त्यातून ‘साधना’ साप्ताहिकाचा ५६ पानी रंगीत अंक तयार झाला. हा अंक आज, १ जुलैपासून सर्वत्र उपलब्ध होत आहे. या अंकासाठी लोमटे यांनी लिहिलेले हे मनोगत...

.............................................................................................................................................

महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने हजेरी लावलीय. ‘असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा’, ही कविकल्पना म्हणून ठीक असली तरी, एवढा उशिरा येणारा पाऊस कित्येक जीवांचा अंत पाहणारा असतो. गतवर्षी वार्षिक सरासरीच्या निम्माच पाऊस पडला. महाराष्ट्रातल्या दीडशे तालुक्यांमध्ये सरकारने अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला. तसा दुष्काळ हा काही अचानक टोळधाडीसारखा येत नाही. त्याची चाहूल आधीच लागलेली असते, अंदाज आलेला असतो. दुष्काळात होरपळणार्‍यांची जी दुर्दशा होते, त्याला केवळ निसर्गच जबाबदार असतो असेही नाही. शिवाय दुष्काळ हा काही फक्त अन्नधान्याचा, पाण्याचाच नसतो- तो नियोजनाचा, धोरणांचा, राजकीय इच्छाशक्तीचा व मूलभूत उपायांचाही असतो.

‘दुष्काळ झळा : निवडणुकीच्या रंगीबेरंगी सतरंजीखाली दडवलेला कचरा’ हा माझा लेख एप्रिलमध्ये दै. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाला. तेव्हा दुष्काळाच्या आणखीही वेगवेगळ्या पैलूंवर लिहावे असे डोक्यात होते. हा लेख वाचूनच ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी साधनाचा एक पूर्ण अंकच दुष्काळावर करण्याची कल्पना बोलून दाखवली. चर्चेतून या अंकाला आकार येत गेला. मग तो अंक संपूर्ण एकहातीच करावा, असे त्यांनी सुचवले. अंकातील सर्व मजकूर एकट्यानेच लिहून काढण्याचे आव्हान होते. प्रत्यक्ष कामाचे स्वरूप ठरल्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या. जिथून मध्य प्रदेशाची हद्द दिसते, अशा वरूड तालुक्यातल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांपासून ते नेहमीच दुष्काळ सोसणार्‍या माणदेशातल्या अनेक गावांपर्यंत या निमित्ताने फिरता आले. 

४५-४६ अंशापर्यंत तडकलेल्या चढत्या भाजणीच्या उन्हात जगण्याचा संघर्ष करणार्‍या रयतेच्या कहाण्यांचा दाह  शरीर-मनाला चटके देणाराच होता. दुष्काळ सोसणार्‍या आणि दुष्काळाशी दोन हात करणार्‍यांशी यानिमित्ताने संवाद साधता आला.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

मराठवाड्यातल्या मंठा, केज, धारूर, भूम, परांडा; विदर्भातल्या लोणार, बुलढाणा, रिसोड, वाशिम, यवतमाळ, अमरावती; माणदेशातल्या सांगोला, आटपाडी, माण, खटाव, जत आणि खानदेशातल्या पारवा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, चाळीसगाव अशा परिसरातल्या अनेक गावांना, तांडे-वाडी-वस्त्यांना भेटी देऊन दुष्काळाची दाहकता समजून घेतली. 

किती तरी गोष्टी नव्याने कळत गेल्या. यातूनच जाणिवा विस्तारतात, आकलनाच्या कक्षा रूंदावतात. समाज मन समजून घेण्याचा पैस वाढतो. असे अनुभव आपल्यालाही खूप काही नव्याने शिकवणारे असतात. आता पावसाने सुरुवात केलीय. अर्थात पाऊस पडला म्हणजे अचानक परिस्थिती बदलते असे होत नाही. आपण मात्र लगेच वेगळ्या परिवेषात जातो. झाडा-पानांवरून निथळणारा पाऊस आणि थंडगार वार्‍याचा स्पर्श यामुळे आधीच्या चटक्यांचा विसर पडू लागतो. एवढेच नाही तर पडत्या पावसात दुष्काळ हा शब्द उच्चारणेही अस्थानी वाटू लागते. पुढची भयाण चाहूल लागेपर्यंत तरी आपल्याला कशाचीच आच लागत नाही. तसे होऊ नये. पर्जन्याआधीची पिडा समजून घ्यावी एवढेच म्हणणे आहे.

.............................................................................................................................................

लेखक आसाराम लोमटे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथाकार आहेत.

aasaramlomte@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......