कोठे गेले गोरक्षक?
पडघम - देशकारण
आ. श्री. केतकर
  • चित्र, साभार - https://www.tdnbangla.com
  • Tue , 09 October 2018
  • पडघम देशकारण भाकड गाय गोवंश गोहत्याGohatya गोरक्षक Go Rakshak मॉब लिंचिंग Mob Lynching

साधारण आठ दिवसांपूर्वी, म्हणजे २६ ऑगस्टला दै. ‘इंडियन एक्स्प्रेस’ (पुणे) मध्ये एक बातमी होती. ती वाचताच दचकायला झाले. ती होती रेल्वे मार्गांवर मरणाऱ्या जनावरांबाबत. त्यांमध्ये देशी गायींचे प्रमाण खूपच जास्त आहे. हे मृत्यू गाडीच्या इंजिनाची धडक बसल्याने वा गाडीखाली सापडून झालेले असतात. अधूनमधून अशा अपघाताने गाडीला उशीर झाल्याची बातमी आपण वाचतो. पण जास्त माहिती आपल्याला नसते, या बातमीमुळे ती मिळाली. गेल्या दोन वर्षांत अशा मृत्यूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २०१५-१६ या वर्षातील २,१८३ वरून ते यंदाच्या आर्थिक वर्षाच्या म्हणजे मार्च अखेरपर्यंत १०,३८२ पर्यंत म्हणजे ३६२ टक्क्यांनी हे प्रमाण वाढले आहे. या एप्रिलपासून इंजिनची धडक बसून एकूण ६,९०० जनावरे दगावली आहेत. गतसालापेक्षा हे प्रमाण ११२ टक्क्यांनी जास्त आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या दोन राज्यांत गोभक्त आणि त्यांनी गोप्रेमापोटी केलेल्या मनुष्यहत्यांचे प्रमाण मोठे आहे, त्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाचा यात मोठा वाटा आहे. अशा अपघातांत मरणाऱ्या गायींचे प्रमाण या दोन राज्यांत प्रत्येकी १८ टक्क्यांवर आहे. म्हणजे देशातील एकतृतीयांश गायी या दोन राज्यांत मरण पावत आहेत.

याच दोन राज्यांत तीन वा चार महिन्यांनीच निवडणुका होणार आहेत. त्यामुळेच प्रश्न पडतो की, ते सारे गोभक्त गेले कुठे? कारण यांबाबत आजवर तरी कुठे काही प्रतिक्रिया, वाद, निषेधमोर्चे, आरोप आणि प्रत्यारोप असे काहीच घडलेले नाही. बरे या बातमीत दिलेली आकडेवारी रेल्वे खात्याकडून मिळालेली आहे. उत्तर मध्य रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वे यांनी पुरवलेली ही आकडेवारी आहे. एखादी गाय कोणी कसायाकडे वा कत्तलखान्यात घेऊन जात आहेत, अशा केवळ संशयावरून गोप्रेमींचे माथे भडकते. पण आता याबाबत त्यांचे रक्त थंड पडले काय? की या दोन राज्यांत सत्तेवरील लोकांना दुखावले तर आपल्यावर कारवाई होईल किंवा आपली कुमक बंद पडेल अशी भीती त्यांना वाटते आहे? पण त्यांनी केवळ संशयावरून माणसं मारलेल्यांच्या संख्येच्या अनेक पट मेलेल्या गोमातांची संख्या असताना ते काहीच प्रतिक्रिया का देत नाहीत? का त्यांना वरिष्ठांकडून तसा आदेश देण्यात आलेला आहे?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आमच्या राज्यात सर्व काही चांगल्या प्रकारे चालले आहे, असे या राज्याच्या सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच सांगण्यात येते. प्रत्यक्षात अनेक बाबी उजेडात आल्या तरी त्यावर चर्चा होऊ दिली जात नाही, काहीही चौकशी न करता सर्वांना क्लीनचीट देण्यात येते. अशीच एक गंभीर बातमी काही महिन्यांपूर्वी आली होती. कसायाकडे नेण्यात येणाऱ्या गुरांना अडवून त्यांना हत्येपासून वाचवण्यात यश आल्यावर, त्या सुटका करण्यात आलेल्या गायींची व्यवस्था करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पांजरपोळातील दोनशेवर गायी गैरव्यवस्थेने, उपासमारीने मेल्याची ती बातमी होती. पण ना त्याबाबत सरकारने काही पावले उचलली, ना गोरक्षकांनी कोणावर हल्ला चढवला. कारण अर्थातच तो पांजरपोळ त्यांच्याच लोकांचा होता आणि मोठा गाजावाजा करून त्याला प्रसिद्धी देण्यात आली होती. आपण किती मोठे काम या गोमातांसाठी करतो आहोत, हे दाखवण्याचा तो एक प्रयत्न/जुमलाच होता. कारण नंतर त्याबाबत एक अक्षरही कुठे प्रसिद्ध होऊ दिले गेलेले नाही. उत्तर मध्य रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात एप्रिलपासून १३०० गुरे दगावली आहेत. गतसालाच्या ३४९ या आकडेवारीपेक्षा यंदा २७१ टक्के वाढ झाली आहे.

रेल्वेमार्गावर मरणाऱ्या गायींबाबत बोलताना प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन ऑफ पंजाबचे अध्यक्ष दलजितसिंग म्हणतात, ‘रेल्वेमार्ग आणि रस्त्यांवर अपघातात होणारे जनावरांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्या मृत जनावरांत बहुतेक गायींचाच समावेश आहे. या गायी दूध देण्याचे बंद झाल्यानंतर कुठेही भटकत असतात. त्या बहुतेक देशी जातीच्याच असतात. येणाऱ्या वर्षांत हा प्रश्न अधिकच व्यापक बनणार आहे. ही गोहत्याच नाही काय?’

दुभती जनावरे भाकड झाल्यावर त्यांना चरण्यासाठी सोडून देण्यात येते, रेल्वेमार्ग सफाईच्या कामगारांनी कितीही प्रयत्न केले तरी, अशा गायी रेल्वेमार्गावर येणे बंद होत नाहीत, ते तरी कुठे कुठे पुरे पडणार? कारण मार्गाच्या बाजूला कुंपणच नसते. आणि अशा मार्गांची लांबीही प्रचंड आहे. या गुरांवर कुणाचीही देखरेख नसते आणि त्यानेच हा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. रेल्वे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांचाही याला दुजोरा आहे. अनेकदा अशा धडकांनंतर इंजिनेही नादुरुस्त होतात. आणि रेल्वेचे नुकसान होते, प्रवाशांचाही खोळंबा होतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

असे असेल तर गोहत्याबंदीने साधले काय, असा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना अशी गुरे विकून मिळणाऱ्या काही हजार रुपयांवर पाणी सोडावे लागले. उलट ती पोसण्यासाठी पदरमोड करावी लागते आणि ती करण्याची ऐपत अनेकांची नसते. ती गुरे खरेदी करणारे बेकार झाले, हलाखीच्या स्थितीतील लोकांना कमी किमतीत मिळणारे मांस बंद झाले, कातडी कमावणाऱ्यांचे काम बंद झाले आणि कातड्याशी संबंधित उद्योगांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला तोंड द्यावे लागले. अर्थात यात कोण कोणत्या जातीधर्माचे हा विचार करण्याचे कारण नाही, कारण नुकसान कुणाचेही झाले तरी ते नुकसानच असते! ते होऊ नये यासाठी उत्तर शोधून काढावे लागते. पण तसे करताना कुणीच दिसत नाही, हीच दुर्दैवाची बाब आहे. तरीही आम्ही गो-माता पूजक, गोप्रेमी आणि गोभक्त आहोत!

(‘साधना’ साप्ताहिकाच्या २२ सप्टेंबर २०१८च्या अंकातून)

.............................................................................................................................................

लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.

aashriketkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......