‘तत्पुरुषां’च्या कवितांपैकी चार कविता
ग्रंथनामा - झलक
कविता महाजन
  • कविता महाजन (५ सप्टेंबर १९६७ - २७ सप्टेंबर २०१८)
  • Fri , 28 September 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक कविता महाजन Kavita Mahajan तत्पुरुष Tatpurush

‘तत्पुरुष’ हा कविता महाजन यांचा पहिला कवितासंग्रह. स्त्री-पुरुष संबंधांचं अनेक पातळ्यांवरचं व्याकरण या संग्रहात व्यक्त झालं आहे. स्त्री-पुरुष संबंधांतील द्वंद्व समास सर्जनशील न होता दुर्दैवानं ‘तत्पुरुषी’ होतो. त्यामुळे या संग्रहाचं नाव ‘तत्पुरुष’ आहे. काही पुरुष सत्पुरुष असतात, पण बरेचसे ‘तत्पुरुष’च असतात. त्या ‘तत्पुरुषां’च्या कवितांपैकी या चार कविता.

...............................................................................................................................................................

१. तशी एखादी कविता

कदाचित

मी कधीच लिहून शकणार नाही तुझ्यासाठी

कवितेची एखादी चटक चमकदार ओळ

धारदार शब्दांची,

जी काळ्याभोर विजेसारखी लखाखेल

शुभ्र कागदाच्या अवकाशागत

तुझ्या हृदयात,

उजळवून टाकेल आसपासचे लख्ख भान.

 

तुझ्या भरभरून देणाऱ्या मनाला

ज्ञात नसेल अभावांची ती जमीन

जिथे उगवू शकते फक्त कविताच

मृगजळाच्या शिंपडणीतून

आणि वाढत जाते

भ्रमांचे, भासांचे टेकू घेऊन.

 

तू तर अंथरलं आहेस तुझं स्वत्व

सर्वदूर हिरवळीसारखं

माझ्या भूत-वर्तमान-भविष्यावर…

 

जगण्याच्या नव्या मातीत

नेऊन रुजवली आहेस माझी मलूल मुळं.

देठादेठांतून वाहू लागेल आता हिरवं रक्त,

माना टाकलेल्या जाणिवांची पाकळ्या न् पानं

पुन्हा ताठ करतील कणा,

तरारून येईल कसब.

 

तरीही मी

लिहून शकणार नाही तुझ्यासाठी कृतज्ञता

कणवेची ओंजळ ओतून जाणाऱ्या

हातांसाठी लिहावी तशी.

मी लिहू शकणार नाही आभार

जे मोजून दाखवतं अंतर

माणसामाणसातलं.

मी लिहू शकणार नाही लोभ

आसक्ती अभिलाषा

 

निदान तोपर्यंत

जोपर्यंत तू माझ्यासाठी बनणार नाहीस

केवळ एक भास,

तुझं प्रेम एक संभ्रम माझ्या मनाचा

आणि तुझं अस्तित्व एक निखळ कल्पना.

तोपर्यंत

लिहू शकणार नाही मी तुझ्यासाठी

तशी एखादी कविता

 

तू माझं वास्तव आहेस.

...............................................................................................................................................................

२. शृंगार

ठसठशीत कुंकवासाठी एक कुयरी,

निरी उकलण्यापुरतीतरी एक चिरी,

काळ्याभोर मण्यांचं मंगळसूत्र,

गच्च हातभर काकणं.

कुड्या कानाची पाळी ओघळतील अशा,

नीट बोलूही न देणारी नथ,

सारा शृंगार काटोकाट जमला आहे.

पायांतील साखळ्याच तेवढ्या जरा

हलक्या वाटतात मालक

पहा ना

त्या घालून चालताही येतंय मला…

...............................................................................................................................................................

३. माझंच

मुलीसाठी आणली आहे एक बाहुली :

तोंडातील बूच काढताच ती रडू लागते

कळवळून टाकणाऱ्या आवाजात;

लाल होतात तिची कानशिलं.

 

तिच्या छातीतील सेल संपेपर्यंतच

पेटणार आहेत कानातील लाल दिवे

आणि उमटू शकणार आहे रडणं

-हे ठाऊक आहे मला.

 

घरात कुणी नसतं तेव्हा

मी तिला तळहातावर घेते

तिच्या तोंडातलं बूच काढून

ऐकत राहते रडणं.

 

-माझंच असल्यासारखं.

...............................................................................................................................................................

४. उरलेली गोष्ट

आजकाल मुलीला येतो कंटाळा

त्याच त्याच गोष्टींचा;

मग बदलून टाकते ती पात्रं, स्थळं.

आणि गोष्ट होते नवी.

 

वाघोबाच्या तावडीतून निसटून

भोपळ्यात बसून जाणाऱ्या म्हातारीची

गोष्ट मी सांगत होते तेव्हाही तिनं असंच

अडवलं मला.

सांगू लागली स्वत:च

तीच गोष्ट नवी निराळी करून :

 

म्हातारी निघाली लेकीकडे

आणि तिला आडवं आलं घर.

म्हणालं : थांब मी तुला खातो.

म्हातारी म्हणाली :

लेकीकडे जाईन, लठ्ठमुठ्ठ होईन

मग तू मला खा.

 

मुलगी म्हणाली, आई,

आता उरलेली गोष्ट तू सांग.

निश्वास टाकत हसून मी सांगू लागले गोष्ट पुढे.

 

म्हातारी म्हणाली :

लेकीकडे जाईन, लठ्ठमुठ्ठ होईन

मग तू मला खा.

पण घर म्हणालं :

तावडीतून निसटून जाऊ द्यायला

मी थोडीच वाघोबा आहे?

तो जनावर होता

मी तर घर आहे.

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/author/26/Kavita-Mahajan

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ramesh singh

Fri , 28 September 2018

श्रद्धांजली.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......