परकीय जीवसृष्टीशी संवाद साधता येईल का?
ग्रंथनामा - झलक
जयंत नारळीकर
  • ‘विज्ञानविश्वातील वेधक आणि वेचक’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 13 July 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक डॉ. जयंत नारळीकर विज्ञानविश्वातील वेधक आणि वेचक

जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं ‘विज्ञानविश्वातील वेधक आणि वेचक’ हे नवंकोरं पुस्तक नुकतंच साकेत प्रकाशन, औरंगाबाद यांच्यावतीनं प्रकाशित झालं आहे. या पुस्तकातील एक प्रकरण...

.............................................................................................................................................

‘परकीय जीवसृष्टीशी संवाद साधता येईल काय?’ या विषयावर वेळोवेळी चर्चा होत असते. ‘स्वत:वरून जगाची परीक्षा’ हे सूत्र त्याच्या मुळाशी आहे. आपल्या आकाशगंगेत १०० अब्जांहून जास्त तारे आहेत. त्यांपैकी १० टक्के सूर्यासारखे मानले, तरी आकडा दहा अब्जांच्या घरात जातो. आता अनेक ताऱ्यांभोवती ग्रह (अथवा ग्रहमाला) सापडले आहेत व त्यात पृथ्वीसारखं जीवसृष्टीला पोषक वायुमंडळ, पाणी, प्रकाश आदी असणारे ग्रहही असावेत, असं खगोलशास्त्रज्ञ सांगतात. खुद्द आपल्या जीवसृष्टीच्या मुळाशी असलेल्या डीएनए रेणूचे घटकरेणू आकाशगंगेच्या विविध भागांत ताऱ्यांदरम्यानच्या विस्तीर्ण प्रदेशात सापडत आहेत. अशा विज्ञानसंमत पुराव्यामुळे वरील प्रश्न विचारणं शक्य होतं. अर्थात यामागची भूमिका अशी की, जेव्हा ग्रहाचं पर्यावरण पोषक असेल आणि त्याला त्याच्या ताऱ्यापासून योग्य प्रमाणात ऊर्जा मिळत असेल, तेव्हाच जीवसृष्टी ग्रहावर नांदते.

एका दृष्टीनं परकीय जीवसृष्टीचं हे चित्र फारसं कल्पक नाही. आपल्याला माहीत असलेल्या एकमेव जीवसृष्टीवरून ते रेखाटलेलं आहे. एखादी वस्तू हरवली तर ती शोधताना प्रकाशित जागेतच पाहायला हवी; कारण अंधारात पाहणं शक्य नाही! यासंदर्भात आपल्या शोधावर सुरुवात करताना मर्यादा येत असली, तरी सुरुवात करताना सोपं आणि मर्यादित लक्ष्य असलेलं बरं.

प्रत्यक्ष अवकाश प्रवास अशक्यप्राय

आपण असं समजून चालू की, आपल्यापासून सहा प्रकाश वर्षं अंतरावर एक प्रगत जीवसृष्टी आहे. ‘प्रकाशवर्ष’ हा पल्ला प्रकाशकिरणं वर्षभरात सर करतात... म्हणजे सुमारे दहा हजार अब्ज किलोमीटर. ‘स्टार ट्रेक’सारखी टीव्ही मालिका पाहणाऱ्याला वाटेल की, आकाशयानातून अंतराळवीरांना शोधासाठी पाठवावं; पण शाळेतलं अंकगणित या सूचनेचा निकाल लावू शकेल. आपल्या तंत्रज्ञानात थोडी भर टाकली, तरी चंद्रापर्यंत जायला एक दिवस लागेल. पृथ्वी-चंद्र हे अंतर प्रकाश सव्वासेकंदात सर करतो. त्याउलट सहा प्रकाश वर्षं हे अंतर प्रकाश सहा वर्षांत पुरं करतो. एका वर्षात सुमारे तीन कोटी सेकंद असतात... म्हणजे सहा वर्षांत १८ कोटी. याचा अर्थ ही प्रगत जीवसृष्टी चंद्राच्या तुलनेत आपल्यापासून सुमारे १५ कोटी पटींनी लांब अंतरावर असेल. याचा अर्थ, आपल्या आजच्या तंत्रज्ञानावरून अंदाज बांधला, तर आपल्याला त्या ताऱ्यांकडं/ग्रहाकडं जायला १५ कोटी दिवस लागतील. म्हणजे जवळपास चार लाख वर्षं! जाऊन-येऊन आठ लाख वर्षं. इतका दीर्घ कालखंड आपले अंतराळवीर जिवंत कसे राहतील? जरी त्यांना गोठलेल्या अवस्थेत इतका काळ जिवंत ठेवता आलं, तरी ते परतल्यावर आठ लाख वर्षांनी त्यांना ओळखणारा कोण असेल?

प्रोजेक्ट डिडॅलस

अर्थात मानव-अंतराळवीर निकटच्या भविष्यात तरी परकीय जीवांशी संपर्क साधू शकणार नाहीत; पण ‘ब्रिटिश इंटर प्लॅनेटरी सोसायटी’नं (BIPS) कागदावर तरी शक्य होईल, अशी योजना कार्यान्वित केली. (ते वर्ष होतं १९७३-७८8 दरम्यानचं. आज तशी योजना अधिक प्रगत तंत्रज्ञान विचारात घेऊ शकेल!) ‘प्रोजेक्ट डिडॅलस’ असं नाव असलेल्या या योजनेत बर्नार्डच्या ताऱ्याभोवती संभाव्य ग्रहावरील अनुमानित सजीवांशी संपर्क साधायचा होता. बर्नार्डचा तारा सुमारे सहा प्रकाश वर्षं अंतरावर आहे, तेव्हा तिथं प्रकाश सहा वर्षांत पोहोचेल. योजनेप्रमाणे अणुऊर्जा वापरून प्रकाशाच्या अष्टमांश वेगानं जाणारं अंतराळयान बनवायचं होतं. BIPS च्या लेखी असं यान बनवणं हे आधुनिक तंत्रज्ञानाला शक्य आहे. हे यान जायला ४८ वर्षं व परतायला ४८ वर्षं... म्हणजे साधारणत: १०० मानवी वर्षांचा कालखंड ते घेणार. यानात तरुण स्त्री-पुरुषांचा एक समूह असणार. त्यांची आपापसात लग्नं होऊन पुढं त्यांची प्रजाही लग्न करून बर्नार्ड ताऱ्याकडं सुखरूप पोहोचेल आणि नंतर ती पृथ्वीवरही परतेल! केवळ तंत्रज्ञानच नव्हे; तर मानवी जीवनाच्या विविध बाबींचा विचार करून ही योजना आखण्यात आली आहे. प्रकाशवेगाच्या अष्टमांशापर्यंत यान चालवत न्यायला इंधन किती लागेल? BIPSच्या लेखी जगातल्या अण्वस्त्रांचे संपूर्ण साठे जेमतेम पुरतील इतकं ! अर्थात, आत्मघातकी शेवटापासून सुटका झाल्याचा आनंद पृथ्वीवरच्या मानवांना लाभेल, ही एक जमेची गोष्ट नव्हे का?

रेडिओ संदेश

पण या मार्गानं आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळायला १०० वर्षं लागणार! त्याहून अधिक सुटसुटीत आणि बिनखर्चिक मार्ग म्हणजे सजीव असण्याची संभाव्य ठिकाणं निश्चित करून तिकडं रेडिओ-संदेश पाठवणं. जर प्रगत सजीव तिथं असले आणि आपला संदेश ‘वाचू’ शकले, तर बहुधा त्यांचे उत्तर येईल. आपला शोध साधारण १०-१५ प्रकाश वर्षं इतक्या अंतरापर्यंत मर्यादित ठेवला, तर २०-३० वर्षांत उत्तर यावं. यासाठी रेडिओ वेव्हलेंथ कोणती वापरावी? आणि संदेश कुठल्या भाषेत, कसा असावा?

वैज्ञानिकांनी अनेक पर्याय विचारात घेऊन शेवटी २१ सेंटिमीटर लांबीच्या रेडिओलहरींना शोधकार्यासाठी प्राधान्य दिलं. या लहरी हायड्रोजन अणूच्या विद्युतभाररहित रूपातून स्वाभाविकरीत्या बाहेर पडतात आणि त्या संपूर्ण आकाशगंगेत असल्यामुळे आपल्याप्रमाणे परकीय सजीवांनाही माहीत असणार. अर्थात त्यांचं अंकगणित आणि मोजमापाचं एकक वेगळं असेल; पण ज्या लांबीला आपण ‘२१ सेंटिमीटर’ म्हणतो ती लांबी वेगळ्या मापकात त्यांना परिचित असणार. त्यामुळं ते जर ‘परकीय सजीवां’चा शोध लावण्यासाठी आपल्या प्रमाणेच रेडिओ-लहरी वापरत असतील, तर आपल्याप्रमाणेच या लांबीला प्राधान्य देतील. हा एक फायदा! दुसरा फायदा म्हणजे, या लहरी लांब पल्ले गाठू शकतात. वाटेत त्यांचं शोषण बहुधा होत नाही आणि तिसरा फायदा म्हणजे या लहरींभोवती गोंगाट कमी असल्यानं त्यांच्याद्वारे पाठवलेला संदेश स्पष्ट कळू शकेल.

अर्थात, वरील दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात पृथ्वीवरची कुठलीही विद्यमान भाषा अयोग्य ठरते. परकीयांशी संपर्क साधायचा असेल, तर गणित आणि विज्ञान यांची भाषा सोईची असते. उदाहरणार्थ आपण (मोर्स कोडसारखं माध्यम वापरून) जर खालील संख्यांचा अनुक्रम पाठवला : २, ३, ५, ११, १३, १७, १९ तर यापुढची संख्या कुठली? अविभाज्य संख्यांची माहिती असलेला सजीव ताबडतोब कळवेल ‘२३’ हे उत्तर!

अशा सांकेतिक पद्धती वापरून संदेश पाठवले जातात व त्यातून गणित आणि विज्ञानातली तथ्यं कळवता येतात. खगोलातल्या गोष्टींची माहितीही देता येते. जर परकीय सजीव आपल्या इतका प्रगत असेल तर उलट संदेश पाठवेल. हे संदेशाचं आदान-प्रदान कुठून व्हावं?

रेडिओ-दुर्बिणी आकाशातल्या रेडिओ-स्रोतांकडून येणारे प्रारण गोळा करतात. त्या रेडिओ-संदेश प्रक्षेपणासाठीही वापरता येतात. असे काम करणारी सर्वांत मोठी दुर्बीण अरीसिबो, पोर्टोरिकोमध्ये आहे. तिच्या ‘डिश’चा व्यास ३०० मीटर आहे. पृथ्वीच्या पोटात खोदून ही डिश बसवली आहे. इथून संदेश पाठवले; पण त्यांची उत्तरेही आलीत का? ती कुठल्या उपकरणात मिळणार?

उत्तर आलं तर ते रेडिओ-लहरींच्या गोंगाटात दडलेलं असेल. ज्याप्रमाणे घरगुती टीव्ही सेट १००-१००० चॅनल वापरतो, तसे या उपकरणात दशलक्ष चॅनल असतात आणि त्यातून येणारा गोंगाट ‘ऐकणारा’ संगणक असतो. सर्व चॅनल एकाच वेळी तपासता येतात आणि अमुक एका चॅनलमधल्या गोंगाटात एक सिग्नल दडला आहे, असं संगणकानं सांगितलं, तर त्या चॅनलवर आपलं लक्ष केंद्रित करून त्याची सखोल परीक्षा करता येते. अद्याप ओळखू येईल असा संदेश मिळालेला नाही! पण तो जेव्हा केव्हा येईल, तेव्हा तो क्षण मानवाच्या इतिहासात अतिमहत्त्वाचा ठरेल; कारण विश्वात आपण एकटे नाही, याची पहिल्यांदा जाणीव करून देणारा तो क्षण असेल. या शतकात हा क्षण येऊ शकेल! निदान आपण तशी आशा बाळगू या!

.............................................................................................................................................

डॉ. जयंत नारळीकर यांच्या या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4442

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......