टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • डाळ आणि मासे
  • Wed , 16 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Modi डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

१. अभेद्य सुरक्षाव्यवस्था भेदून मोदींना डासही चावू शकणार नाही : शिवसेनेचा टोला

शिवाय मित्रपक्षांनी आता माँ जगदंबेलाही साकडं घातलंय. आता फक्त सतत डोकं चावणाऱ्या मित्रपक्षांची डासांच्या चाव्यापेक्षा भयानक वाटणारी भुणभुण सोडली, तर मोदींना कसलाच धोका नाही, हे स्पष्टच आहे.

..........

२. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नव्याने निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझे चांगले सख्य आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

'आम्ही लहानपणापासूनचे घट्ट मित्र आहोत. मी अजूनही त्याला डोन्या-टोण्याच म्हणतो. मी चहा विकायचो, तेव्हा तो कप विसळायला मदत करायचा. एकाच शाखेत जायचो आम्ही. तो अमेरिकेचा अध्यक्ष बनावा, अशी माझी लहानपणापासूनची इच्छा होती…' हे भाषण मॅडिसन स्क्वेअरमध्ये ऐकायला कान आतुरले आहेत…

..........

३. केरळमधल्या एका चर्चने सर्वसामान्यांसाठी दानपेटी खुली केली असून 'दानपेटीतले सुटे पैसे घेऊन जा आणि शक्य होईल तेव्हा ते परत करा', असा उपक्रमच राबवला आहे.

देशातल्या सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांनी या चर्चचा कित्ता गिरवायला हवा. माणुसकीचा धर्म सगळ्यात मोठा असतो, याचं भान नसलेले धर्म आणि त्यांची भव्य मंदिरं यांचा भुईला भार करण्यापलीकडे उपयोग काय?

..........

४. नोटबंदीमुळे ईशान्य भारतात वस्तू विनिमय पद्धतीचं पुनरुज्जीवन, एक किलो माशांच्या बदल्यात तीन किलो डाळ.

बघा, दैनंदिन व्यवहारातही परस्परांमध्ये प्रेम वाढवण्याचा हा किती सुंदर मार्ग आहे. एकमेकां साह्य करून देश काळा पैसामुक्त करण्याचा सुपंथ धरण्याची ही केवढी मोठी संधी आहे. शिवाय आपल्या उज्ज्वल परंपरांचंही पुनरुज्जीवन होतंय. लवकरच आपण वल्कलं धारण करून कंदमुळंही खायला लागू.

..........

५. नोटबंदी जाहीर झाल्यापासून काश्मीरमध्ये एकदाही दगडफेक झालेली नाही : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

काश्मीरमध्ये सगळे अतिरेकी आणि आंदोलक पाचशे रुपयाला दोन किलो आणि हजार रुपयांना पाच किलो रेटने दगड विकत घेत होते दगडफेकीसाठी. त्यांच्या या देशद्रोही उद्योगाला चांगलंच बूच बसलं आहे. गोवा आधी फेणीसाठी प्रसिद्ध होता, आता तर्री… सॉरी, पर्रीकरांसाठी प्रसिद्ध होणार, यात शंकाच नाही.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......